मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी ठाण्यात झालेल्या ‘उत्तर सभे’त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली. ठाण्यातील ‘उत्तर सभेत राज ठाकरे यांनी चौफेर टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पवार कुटुंबावर गंभीर आरोप केले आहे. सध्या राज्यातील राजकारण या सभेनंतर चांगलेच तापले आहे. राज ठाकरे यांच्या आरोपांवर आता राज्यातील ठाकरे सरकारच्या मंत्र्यांकडूनही प्रतिउत्तर दिले जात आहे.
यातच या सभेवरून आता केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी मनसेवर निशाणा साधला आहे.रामदास आठवले म्हणाले,’भाजपचा मनसेला सोबत घेण्याचा निर्णय योग्य होणार नाही. आम्ही भाजपसोबत असल्याने त्यांनी मनसेला सोबत घेऊ नये. आरपीआय बरोबर असताना भाजपला मनसेची काय गरज ?” असा सवालही आठवले यांनी उपस्थित केला आहे.
आठवले पुढे मनसेवर निशाणा साधत म्हणाले,“मनसेच्या सभांना गर्दी होते पण जनतेचे मते मात्रं मिळत नाहीत. मनसे हा आता मागे पडलेला पक्ष आहे. मनसेने हिंदुत्वाचा मुद्दा घेतला तरी त्यात काही एक फायदा होणार नाही.’ असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंच्या सभेत होणाऱ्या गर्दीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केला आहे.
दरम्यान, राज्यात काही दिवसांवर राज्यातील मुंबईसह प्रमुख महानगरपालिकांच्या निवडणुका ठेपल्या आहेत. त्याआधीच मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली होती. राज ठाकरे यांनी गुडीपाडवा मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेवर सडकून टीका केली होती. तर भाजपचे कौतुक केलं होतं. तेव्हापासून भाजप-मनसे युतीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. यावर रामदास आठवले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.