वालचंदनगर -शरद पवार यांचे साताऱ्यामधील धो-धो पावसातील भाषण अनेकांना भावले. अनेकांनी त्यातून लढण्याची मोठी प्रेरणा घेतली. त्याच प्रेरणेतून इंदापूरमधील शेतकऱ्याने घनदाट बाभळांचे साम्राज्य असणाऱ्या जमिनीत हिरवागार द्राक्षांचा मळा फुलवलाय.
इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर- कळंब मधील सोमनाथ पवार यांची द्राक्षाची बाग जेथे आहे, त्याजागी घनदाट काटेरी बाभळांचे घनदाट जंगल होते. 2012 सालापासून वालचंदनगर, कळंब, रणगांव, लासुर्णे, अंथुर्णे आणि निमसाखर या गावातील माजी खंडकऱ्यांना शासन निर्णयानुसार 2250 एकर क्षेत्र वाटप करण्यात आले. जानेवारी 2016 साली सोमनाथ पवार यांना साडेअकरा एकरचा लाभ मिळाला. मात्र घनदाट जंगलावर मात करित मोठ्या कष्टाने पवार यांनी तिथे नंदनवन फुलवलेय.
पवार यांना द्राक्ष लागवडीची प्रेरणा अतुल सावंत व बापूराव पडळकर पाटील या कृषी मित्रांकडून मिळाली. त्यानुसार 5 फेब्रुवारी 2018 ला पवार यांनी साडेतीन एकरवर खुंट रोपांची लागवड केली. सध्या त्यांच्या बागेचा हा पहिलाच बहार असून पवार यांना द्राक्षे बागेचा कोणताही अनुभव नसताना पहिलेच पिक 85 रुपये प्रति किलोच्या दराने थेट युरोपमध्ये निर्यात केलेय. शिवाय माळरानावर द्राक्षाचा मळा फुलवण्यात नाशिक येथील द्राक्षतज्ञ मंगेश भास्कर यांनी दहा ड्रम थेरी तंत्रज्ञानाचा वापर केला.
यामुळे जमिनीची सुपीकता वाढून उत्पादन वाढीस मदत झाली. शिवाय या सर्व कामात पत्नी विद्या पवार यांनी ही मोठी साथ दिली. कष्टाला चांगली किंमत मिळाल्याने विद्या पवार यांनी समाधान व्यक्त केलेय.
वाळूचे कणं रगडिता तेल ही गळे, या म्हणी प्रमाणे आम्ही प्रयत्न करीत राहिलो. त्याचे योग्य फळ मिळायल लागले आहे. शेतात मनापासून घाम गाळला तर काळी आईसुद्दा भरभरुन देईल.
-सोमनाथ पवार, द्राक्ष उत्पादक वालचंदनगर
द्राक्षांची निर्यात करणे हे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान असते. मात्र योग्य तंत्रज्ञान व योग्य सल्ला मिळाल्यास काहीच अशक्य नाही.
-विद्या पवार, सोमनाथची पत्नी
ज्यावेळी सोमनाथ यांना शासनाकडून जमिन मिळाली व द्राक्ष लागवडीचा पहिलाच निर्णय घेतल्यावर आजूबाजूचे त्यांना चिडवत होते; मात्र अशांचीही सोमनाथने कानउघाडणी करत महत्वाचा करून दाखवले आहे.
-मधुकर झगडे, द्राक्ष निर्यातदार शेतकरी