सीएए, एनआरसी, एनपीआरच्या विरोधात पिंपरीत निषेध महासभा
पिंपरी – शिक्षणाची कागदपत्रे मागितल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी शांत बसले होते. आता जनतेकडून कागदपत्रे मागत आहेत. आम्ही कागदपत्रे देणार नाहीत. एनपीआर मान्य करणार नाहीत. देश से हमारा नाता, कागज से नही दिलसे है, असे जेएनयूचा माजी विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालिद याने आपले मत व्यक्त केले. पिंपरी-चिंचवड संविधान बचाव समितीच्या वतीने आयोजित नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) या कायद्याच्या विरोधात निषेध महाजनसभेत तो बोलत होता.
पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकाच्या पाठीमागे शुक्रवारी (दि.17) झालेल्या निषेध महासभेला ऍड. अविक सहा, मानव कांबळे, मारुती भापकर, अखिल मुजावर, प्रताप गुरव, सुरेश बेरी, माधव आव्हाड या वेळी उपस्थित होते. तसेच न्यायालयाचा निकाल 22 जानेवारीला येणार आहे. शहरात 22 तारखेपर्यंत अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करण्यात येणार आहे.
पुढे बोलताना उमर म्हणाला की, आम्ही कागदपत्रे देणार नाहीत. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार आहोत. कोणतीही हिंसा होऊ दिली जाणार नाही. रोहित वेमुलाची आत्महत्या नव्हती. त्याचा खून केला होता. त्याचे विचार मारले नाहीत. रोहित आमच्यामध्ये जिवंत आहे. संसदेत तुमचे बहुमत आहे. त्याचा तुम्हाला अहंकार आहे. मात्र, जनता रस्त्यावर उतरुन सरकारच्या विरोधात बहुमत सिद्ध करेल. नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि एनपीआर या कायद्यांमुळे विविध नागरिकांमध्ये नाराजी आहे. नागरिकांना आपले भारतीयत्व सिद्ध करावे लागणार आहे. सरकारने हे कायदे मागे घ्यावेत, अशी मागणी यावेळी केली.