नवी दिल्ली – आसाम सरकारने ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रमांतर्गत 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राज्यभरात सुमारे 80 लाख राष्ट्रध्वज फडकवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी राज्यातील जनतेला १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान घरोघरी राष्ट्रध्वज फडकवण्याचे आवाहन केले आहे. त्याचवेळी या प्रकरणावर विरोधी पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, विरोधक या प्रकरणाला नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सशी जोडत आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी मंगळवारी एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलतांना सांगितले,’राष्ट्रीय ध्वज फडकावणे हा एनआरसी NRC (National Register of Citizens for Assam ) मध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करण्यापेक्षा राष्ट्रीयत्व सिद्ध करण्याचा अधिक विश्वासार्ह मार्ग आहे.
उदलगुरी येथील कार्यक्रमात सरमा पुढे म्हणाले,”यंदा 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी राष्ट्रध्वज फडकावा. तुम्ही फक्त NRC साठी अर्ज करून भारतीय नागरिक आहात, ते पुरेसे नाही. तुम्हाला ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रमांतर्गत’सहभाग घेऊन पुरावा द्यावा लागेल.’ असेही ते म्हणाले आहे.
त्यांच्या या भूमिकेवर आसाम काँग्रेसच्या प्रवक्त्या अरुबा भट्टाचार्जी यांनी विरोध दर्शविला असून मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल करताना त्या म्हणाल्या की, “मुख्यमंत्री कदाचित विसरले असतील की आज ते RSS (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) ची सेवा करत आहेत. वर्षानुवर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर राष्ट्रध्वज फडकवला गेला नाही. मग आरएसएस देशद्रोही आहे का?’ असं म्हणत भट्टाचार्जी यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
“लोकांना तुमच्या देशभक्तीच्या धड्याची गरज नाही, या देशाने ब्रिटीशांशी लढा दिला आहे, त्यामुळे देशवासियांनी काय करावे यावर भाष्य करण्यापूर्वी सरमा यांनी आपली जबाबदारी पाहावी. मुख्यमंत्री असताना ते एनआरसीवर कसे भाष्य करू शकतात? एनआरसी एक आहे. घटनेनुसार प्रक्रिया केली जाते आणि आमच्या देशभक्तीवर निर्णय घेणारे तुम्ही कोण ?” असा सवालही भट्टाचार्जी यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.