प्रशांत जाधव
सातारा – जिल्ह्यात लंपीच्या लसीकरणात जागेवर जाऊन जनावरांना लस न देताच केवळ कागदोपत्री लसीकरणाचे आकडे फुगवले जात असून त्याला काही सरपंचांचा हात असल्याचे स्पष्ट झाले होते. त्याबाबत दै. “प्रभात’ने परखड भाष्य करून मुक्या जीवांशी खेळ करणाऱ्यांचा पर्दाफाश केला होता. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या जिल्हा परिषद प्रशासनाने खटाव तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांचा अचानक आढावा घेऊन कागदपत्रांची तपासणी केली असता लसीकरणाच्या नोंदीच केल्या नसल्याचे स्पष्ट झाल्याने “प्रभात’च्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर जिल्हा पशुसंर्वधन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांनी कातरखटाव व पडळ येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस धाडल्या आहेत.
लंपी आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासन काटेकोरपणे काम करत असताना स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून कामात चालढकलपणा करून मुक्या जनावरांच्या जीवाशी खेळ केला जात होता. सरसकट लसीकरण न करता सोईच्या ठिकाणी व मोजक्या ठिकाणी लसीकरण करून गावोगावचे सरपंच हाताशी धरून लसीकरण पूर्ण झाल्याचे दाखले घेतले गेले होते.
याप्रकरणी “प्रभात’ प्रतिनिधींनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर झालेल्या पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत ना. शंभूराज देसाई यांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिली होती. त्यावेळी जिल्हा परिषद सीईओंनी स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सरपंचाकडून घेतलेल्या पत्राचा हवाला देत लसीकरण शंभर टक्के झाल्याचा दावा केला होता. त्यानंतर “प्रभात’ने अशी बोगस पत्रे मिळवून ज्या गावातील पत्र त्या गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर जिल्हा परिषदेकडील त्या बोगस पत्रांचा उलगडा झाला. त्याबाबत गेले दोन दिवस “प्रभात’ने मुक्या जीवांशी खेळ करणाऱ्यांचा पर्दाफाश करणारे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर जागे झालेल्या जिल्हा परिषद प्रशासनाने दि. 10 रोजी खटाव तालुक्यात अचानक भेटी देऊन काही पशुवैद्यकीय दवाखान्यांची तपासणी केली असता भयाण वास्तव समोर आले.
पडळ येथील अधिकाऱ्यांनी लसीकरणाच्या केवळ कच्च्या नोंदी करून त्या रजिस्टरमध्ये केल्या नसल्याचे समोर आले. तसेच पडळचे डॉ. शहाजी पाटील हे नियुक्तीच्या ठिकाणी राहत नसल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत असल्याचे समोर आल्याने डॉ. संजय शिंदे यांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कातरखटाव येथील पुशवैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खाडे यांनीही लंपीसारख्या आजाराला गांर्भीयाने न घेता आवश्यक तिथे लसीकरण व उपचार न केल्याचे डॉ. शिंदे यांच्या निर्दशानास आले. त्यामुळे डॉ. संजय शिंदे यांनी या दोन्ही अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
“प्रभात’ खऱ्या अर्थाने हिरो
माणसांसाठी पुढे येणारे अनेकजण असतात. मात्र, मुक्या जनावरांच्या आरोग्याशी सुरू असलेले खेळ बंद करण्यासाठी दै. “प्रभात’ पुढे आले. जिल्ह्यातील काही भागात लसीकरणाची सुरू असलेली बोगस आकडेवारी पुराव्यांसह समोर आणून जनावरांना व शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. त्यामुळे गावकुसात राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या मनात “प्रभात’ हिरो झाल्याची भावना वडूज येथील सामाजिक कार्यकर्ते विजय शिंदे, योगेश जाधव यांनी व्यक्त केली.