पिंपरी – पिंपळे-गुरव, सांगवी भागात भारतीय जनता पक्षाचे 11 नगरसेवक होते. या नगरसेवकांनी आपल्या परिसरात बेकायदेशीर कामे केली. अनधिकृत इमारती उभारून पैसे कमविले. भाजपचे नगरसेवक स्वतः स्मार्ट झाले. मात्र, पिंपळे-गुरव, सांगवी भाग स्मार्ट झालाच नाही, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी केला आहे.
दै. प्रभातच्या पिंपरी-चिंचवडच्या विभागीय कार्यालयामध्ये गणरायाच्या आरतीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप आणि सहकारी आले होते. त्या वेळी डिजिटल प्रभातशी संवाद साधताना जगताप बोलत होते. या वेळी शिक्षण मंडळाचे माजी सभापती धनंजय भालेकर, बालाजी काळे, संदीप काटे, युवराज पवार, राहुल काळे उपस्थित होते.
2017 पूर्वी राष्ट्रवादीची सत्ता असताना पिंपळे-गुरव, सांगवी भागात जी विकास कामे मंजूर झालेली होती, तीच कामे भाजपने केली. नवीन एकही काम केले नसल्याचे सांगत जगताप पुढे म्हणाले, शहरातील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न, शास्तीकराचा प्रश्न सोडविण्यात भाजपला यश आले नाही. आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचीच सत्ता येणार आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली भाजपच्या नगरसेवकांनी एकच काम दोन-दोन वेळा करून पैशांची लुटमार केली आहे. भाजपच्या नगरसेवकांच्या नातेवाइकांना कामाचे ठेके दिले. स्मार्ट सिटीत सर्व बोगस कामे केली असल्याचा आरोपही माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी केला. सांगवी, पिंपळे गुरव भागातील एकाच रस्त्यावरील फुटपाथ चार ते पाच वेळा उखडून पैसे उकाळल्याचेही जगताप म्हणाले.
2017 ला राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता असताना विरोधी पक्षात असलेल्या भाजपाने 25 लाखांच्या विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती खरेदीत मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करून रान उटविले होते. मात्र, ना भय ना भ्रष्टाचार अशी वल्गणा करून भाजपने 2017 मध्ये महापालिकेत सत्ता मिळवली. गेल्या पाच वर्षांत भाजपाच्या राजवटीत मोठा भ्रष्टाचार झाला. महापालिकेच्या इतिहासात स्थायी समिती सभापतीला जेलवारी करावी लागली. ही शहरातील सुज्ञ जनता पाहत आहे. त्यामुळे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत 100 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून येतील, असा विश्वासही जगताप यांनी केला आहे. शहरात जो काही विकास झाला आहे, तो अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली झाला आहे, असे ते म्हणाले.