वडगाव मावळ -भाद्रपद चतुर्थीला लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन झाले की, सर्व जण अगदी आतुरतेने वाट पाहतात ती गौरी आगमनाची.गणरायापाठोपाठ गौराईचेही घरोघरी शुभागमन झाले आहे. गौरींचे आगम झाल्यानंतर घरोघरी पारंपारिक पद्धतीने पूजा करून नैवेद्य दाखवण्यात आला. गौराईचे घरामध्ये आगमन झाल्यानंतर हळदीच्या ठशांनी चंदनाचे बोट लावलेल्या पावलांचे ठसे घरभर उमटवले.
गणरायाच्या आगमनानंतर घरोघरी वेध लागतात ते गौरी आमगनाचे. आज गौरींचे आगमन झाले असून घरोघरी गौराईचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. मावळात गौरी आगमन ते विसर्जन हा तीन दिवसाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, यंदा दोन वर्षांनंतर निर्बंधममुक्त वातावरणात गौरी आणल्या आहेत.विविध भागात गौरी आवाहन आणि मांडण्याच्या पद्धतींमध्ये वैविध्य आढळून येते. महिलांनी आपापल्या परंपरा, पद्धती, कुळाचार यांना अनुसरून गौरी पूजन केले.
गौराईचे आगमन हा महिलांचा आवडता सोहळा असतो. घराची स्वच्छता करण्यापासून ते त्यांच्यासाठी वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थांची मेजवानी आणि रेखीव, कलाकुसरीच्या दागिन्यांची भेट देऊन महिलांनी गौराईचे स्वागत केले. कामशेत परिसरातील घराघरांतील सुवासिनी, महिला व कुमारिका यांनी पाणवठ्याच्या ठिकाणी जाऊन तेथे कळशीत गौराईचे डहाळे पूजन करत गौराईच्या गीतांवर फेर धरून गौरी गीते गात या पारंपरिक सणाचा आनंद लुटला. नऊवारी साडी, केसांचा अंबाडा त्यावर गजऱ्याचा नखरा, नथ, गळ्यात हार, मंगळसूत्र असा पारंपरिक साजश्रृंगार करून महिलांनी गौरीच्या डहाळ्यांचे पूजन केले. त्यानंतर गणरायाशेजारी गौराईची प्रतिष्ठापना करण्यात आली.