मुंबई : एकीकडे राज्यात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्ताने शिवसेना आणि सत्ताधाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक होताना पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या दिवसाचे औचित्य साधत राज्यातील जनतेला उद्देशून खुले पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी ‘रझाकारां’सोबतच ‘सजाकारां’चाही उल्लेख करत खोचक टीका केली आहे.
औरंगाबादमधील विजयस्तंभाजवळ दरवर्षी सकाळी नऊ वाजता होणारा शासकीय कार्यक्रम आज सकाळी सात वाजताच घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना हैदराबादला अमित शाह यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कार्यक्रमाला उपस्थित राहायचे असल्याने या कार्यक्रमाच्या वेळेत बदल केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला. त्यापाठोपाठ शिवसेनेकडून औरंगाबादमध्ये सकाळी ९ वाजता पुन्हा एकदा ध्वजारोहण करण्यात आले. त्यामुळे या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि शिवसेना यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक होताना पाहायला मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी खुले पत्र लिहून त्यातून आपली भूमिका मांडली आहे. “माझं तर म्हणणं आहे की आता जे नवं शिक्षण धोरण येतंय, त्यानुसार त्या त्या राज्यातील पुसून टाकला गेलेला इतिहास शिकवला जाणार आहे. त्यामुळे आता मराठवाडा मुक्ती संग्रामाचा विस्तृत इतिहास पाठ्यपुस्तकांमध्ये शिकवला गेला पाहिजे. संयुक्त महाराष्ट्रासाठीचा लढा आणि मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा हे महाराष्ट्राने आणि मराठी माणसाने कदापि विसरता कामा नये”, अशी मागणी या पत्रातून राज ठाकरेंनी केली आहे.
“संभाजीनगरकरांच्या उरावर फक्त रझाकारच नाहीयेत, तर आधुनिक सजाकारही येऊन बसलेत. गेली कित्येक वर्ष संभाजीनगर महापालिकेच्या खुर्चीत बसून लूट करणारे आणि रोज संभाजीनगरकरांना शिक्षा भोगायला लावणारे सजाकार. अर्थात, लवकरच मनसे रझाकार आणि सजाकार या दोघांचा बंदोबस्त करेलच”, असेही राज ठाकरे या पत्रात म्हणाले आहेत.