मुंबई – कर्नाटक विधानसभेच्या 224 पैकी 135 जागांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे. त्यामुळे अर्थातच काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आहे. तर दुसरीकडे भाजपला केवळ 65 जागा जिंकता आल्या आहेत. या निकालानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी कर्नाटकातील विजय पाकिस्तानचा विजय असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
पत्रकार परिषदेत नितेश राणे म्हणाले की, “कर्नाटकातील विजय हा पाकिस्तानचा विजय आहे का? पाकिस्तानचे झेंडे फडकवले जात आहे. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा तेथे दिले जात आहे. काल तर हिंदू मंदिरांसमोर मुद्दाम फटाके वाजवले गेले. हिरवे झेंडे फडकवले गेले. कर्नाटकमध्ये कोण जिंकलयं हाच प्रश्न पडला आहे.
“हे सगळे करून तुम्ही नेमक कोणाला खुश करत आहात? कोणाला संदेश देताय? कर्नाटकच्या हिंदूला येथे कॉँग्रेस नाही तर पाकिस्तान जिंकला, असा संदेश तुम्हाला द्यायचा आहे का? हिंदू समाजावर दबाव टाकायचा का?”, असा सवालही यावेळी नितेश राणे यांनी केला.
याशिवाय नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर देखील निशाणा साधला. ‘बाळासाहेब असते तर तर त्या हिरव्या झेंडा फडकवणाऱ्या बद्दल कोणत्या भाषेत अग्रलेख लिहायला लावला असता? याबद्दल संजय राऊत यांनी आठवण करून घ्यावी,’ असेही नितेश राणे म्हणाले आहेत.