मुंबई – भाजप-सेना युती सरकारच्या काळात महाराष्ट्रात सुरु करण्यात आलेली जलयुक्त शिवार योजना महाविकास आघाडी सरकार गुंडाळणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्या. याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्राचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी, ‘जलयुक्त शिवार योजनेची मुदत संपली असून राज्य सरकार या योजनसेस वाढीव मुदत देणार नाही’ असं स्पष्ट केलं.
शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी जलयुक्त शिवार योजनेबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाचे विधान परिषदेमध्ये लेखी उत्तर सादर करताना गडाख यांनी ही माहिती दिली.
‘जलयुक्त शिवार योजनेची मुदत गतवर्षी ३१ डिसेंबर रोजी संपुष्टात आल्याने ही योजना बंद करण्यात येणार असून राज्य सरकार ही योजना बंद पाडत असल्याची माहिती दिशाभूल करणारी आहे. या योजनेअंतर्गत सुरू असलेली कामं पूर्ण करण्यासाठी ३१ मार्च ही अंतिम मुदत असणार आहे.’ असं देखील गडाख यांनी सांगितलं.