तीन वर्षांत 45 अपघात : 6 जणांनी गमावला जीव
पुणे – जलद आणि सुरक्षित प्रवासाचे गाजर दाखवत सुरू असलेल्या “बीआरटी’ प्रकल्पांवर महापालिका दरवर्षी 10 ते 12 कोटींचा चुराडा करते. पण, याच सुरक्षेच्या नावाखाली तीन वर्षांत बीआरटी मार्गांवर 45 अपघात झाले असून, त्यात 53 जण जखमी झाले आहेत. त्यात 6 प्राणांतिक अपघातांचा समावेश आहे.
पीएमपी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 2017 ते डिसेंबर 2019 अखेर “बीआरटी’ मार्गात एकूण 53 अपघात झाले आहेत. त्यात 6 प्राणांतिक अपघातांचा समावेश आहे. तर तब्बल 21 गंभीर अपघात झाले असून त्यात 24 जण जायबंदी झाले आहेत. तर सुमारे 17 किरकोळ अपघात झाले असून त्यात 23 जण जखमी झाले आहेत. तर इतर एक अपघात झाला आहे. ही संख्या मागील काही वर्षांच्या तुलनेत कमी असली तरी, बीआरटी मार्ग सुरक्षित ठेवण्यात यंत्रणांना सपशेल अपयश येत आहे.
दरम्यान, बीआरटी मार्गाच्या या घटनांबद्दल प्रशासन गंभीर नसल्याच्या तक्रारी यापूर्वीदेखील झाल्या आहेत. मात्र, त्याबद्दल कोणीही बोलण्यास तयार नाही. त्यामुळे पुणेकरांना मात्र हा बीआरटी जीवघेणा ठरत आहे. त्यामुळे प्रशासनाने जागे होण्याची गरज आहे.
आतापर्यंत अडीचशें कोटींचा चुराडा
“बीआरटी’ सुरू केल्यापासून या मार्गावर अपघातांची मालिका थांबलेली नाही. त्यामुळे अपघात होताच सुरक्षा उपाय करण्यासाठी महापालिकेला जाग येते. त्या अंतर्गत गेल्या 12 वर्षांत प्रशासनाने जवळपास 230 ते 250 कोटी रुपयांचा खर्च केला आहे. मात्र, त्यानंतरही अपघातांचे सत्र सुरूच आहे. तर प्रशासनाने आता “बीआरटी’ मार्गच चुकल्याचे निष्कर्ष काढत नव्याने हे मार्ग विकसित करण्याचा घाट घातला असून त्यासाठी पुन्हा कोट्यवधी मोजले जाणार आहेत.
सर्व उपाय कूचकामी
बीआरटी मार्गातील अपघात रोखण्यासाठी ट्रॅफिक वॉर्डन नेमले आहेत. मात्र, हे उपाय कूचकामी ठरली आहे. येथे लावलेली बॅरिकेड्स तोडून वाहने आत जातात. तर वर्षात 10 ते 12 घटना वॉर्डनला मारहाण करणे, वॉर्डनच्या अंगावर गाड्या घालण्याच्याही घडतात.
रस्त्यावरीलही अपघात वाढले
“बीआरटी’तून इतर वाहनांना प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे या वाहनांची गर्दी मुख्य रस्त्यावर येते. परिणामी, मुख्य रस्त्यावर ताण वाढून या रस्त्यावरही अपघातांची संख्या लक्षणीय वाढली आहे. मात्र, हे अपघात “बीआरटी’ मार्गामुळेच होत असले, तरी त्याची कोणतीही स्वतंत्र नोंद ठेवली जात नाही. मात्र, कारण बीआरटीच आहे.