मंचर -कळंब (ता. आंबेगाव) येथे लक्झरी बसचालकाला डुलकी लागल्याने बसवरील ताबा सुटून बस थेट दुकानामध्ये घुसली, तसेच महावितरण कंपनीच्या विद्युत खांबाला बसची धडक बसल्याने खांब कोसळला. सुदैवाने विद्युत पुरवठा खंडित झाल्याने अनर्थ टळला. खासगी लक्झरी बसचालकाच्या विरोधात दुकानमालक मयुर भालेराव आणि महावितरण कंपनीचे माधव मुंडे यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
धुळे येथून पुण्याच्या दिशेने लक्झरी बस निघाली होती. बसमध्ये 30 प्रवासी होते. कळंब चौकात असणाऱ्या महावितरणच्या विद्युत खांबाला बसचालक विजय पाटील (अमळनेर) याचा झोपेच्या डुलकीमध्ये बसचा ताबा सुटल्याने बस थेट मयुर भालेराव यांच्या दुकानात घुसली. बसची धडक विद्युत खांबालाही बसल्याने हा खांब जमीनदोस्त झाला आहे. या विद्युत खांबाचे नुकसान झाले असल्याचे महावितरणचे कळंब शाखा व्यवस्थापक माधव मुंडे यांनी सांगितले.
दुकानमालक मयूर भालेराव आणि महावितरणचे अधिकारी माधव मुंडे यांनी लक्झरीचालक विजय पाटील याच्याविरोधात मंचर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. घटनास्थळी अधिकारी माधव मुंडे, वीज मित्र कर्मचारी सौरभ भालेराव, प्रवीण कानडे, संपत कानडे, नवनाथ डोके, आकाश शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली. गावातील विद्युत पुरवठा पहाटेपासून खंडित आहे. दोनशे ग्राहकांना फटका बसला आहे.
महामार्गावरील विद्युत खांब त्वरित हटवावेत
पुणे-नाशिक महामार्ग अतिक्रमण विरोधी कारवाई दरम्यान कळंब ग्रामपंचायतीने रस्त्यालगतचे महावितरण कंपनीचे खांब दुसरीकडे हलवावे, अशी मागणी निवेदनाद्वारे महावितरण नॅशनल अथोरिटी ऑफ इंडिया आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे केली होती; परंतु मागणीचा विचार न झाल्याने ही दुर्घटना घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे.
भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी महावितरणने रस्त्यालगतचे खांब लवकर दुसरीकडे हलवावे, अशी मागणी पंचायत समितीचे माजी सभापती वसंतराव भालेराव,उषाताई कानडे,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद कानडे,भीमाशंकर कारखान्याचे संचालक रमेश कानडे, सरपंच राजश्री भालेराव, उपसरपंच डॉ. सचिन भालेराव यांनी केली आहे.