स्वयंघोषित हवामान शास्त्रज्ञांमुळे शेतकरी अडचणीत
भाऊ ठाकूर
राहू – जून संपत आला तरी पावसाचा थेंब देखील पडला नाही. त्यामुळे शेतकरी पुरता अडचणीत सापडला आहे. परंतु यापेक्षा देखील चुकीच्या हवामानाच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांची जास्त गोची झाली आहे. आता स्वयंघोषित हवामान शास्त्रज्ञ देखील शेतकऱ्यांची चेष्टा करताना दिसून येत आहेत. मान्सूनची तारीख आल्यापासून अनेकांनी अनेक अंदाज वर्तविले आहेत. परंतु एकही अंदाज खरा ठरला नाही. मान्सूनने सुरूवात केल्यापासून हवामान खात्याने देखील अंदाज दिले. परंतु हाती काहीच आले नाही. भिक नको पण कुत्रं आवर या म्हणीप्रमाणे पाऊस नको पण अंदाज आवरा, असा सूर शेतकऱ्यांमधून आळवला जात आहे.
विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात देखील अनेक स्वयंघोषित हवामानशास्त्रज्ञ तयार झाले आहेत. सगळ्यांचे अंदाज वेगवेगळे होत आहेत. तर शासकीय हवामान खात्याचा अंदाज वेगळाच येत आहे. त्यामुळे “विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती, अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. परंतु ही परिस्थिती शासकीय हवामान खात्याच्या हलगर्जीपणामुळे तयार झाली आहे.
मागील पंधरवड्यात अनेक स्वयंघोषित हवामान शास्त्रज्ञांनी मुसळधार पावसाचा अंदाज दिला होता.परंतु ठिपूस देखील पडला नाही.तर आजही खासगी हवामान शास्त्रज्ञ हे शंभर टक्के पाऊस पडेल, असा अंदाज सांगत आहेत, तर शासकीय हवामान खाते हे दुष्काळ पडू शकतो, असा अंदाज देत आहे.
या दोन्हीमुळे शेतकरी संभ्रमावस्थेत गेला आहे. आज अनेक ठिकाणी बाजरीच्या पेरण्या, उसाच्या नवीन लागवडी महत्वाची कामे रखडल्या आहेत. परंतु अशा अंदाजामुळे शेतकरी थांबून आहे.जर पावसाची खात्री असेल तर उशिरा का होईना, लागवड किंवा पेरणी करता येईल. परंतु जर वेळेत पाऊस नाहीच झाला तर शेतकरी मेटाकुटीला येऊ शकतो. अशा परिस्थितीत शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
हवामान खात्याने विश्वासार्हता जपावी
हवामान खात्याने आपली विश्वासार्हता जपणे महत्वाचे आहे. शंभर टक्के नाही परंतु काही प्रमाणात का होईना, हवामान खात्याचा अंदाज बरोबर येणे आवश्यक आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना खासगी हवामान शास्त्रज्ञावर अवलंबून रहावे लागणार नाही. खासगी हवामान शास्त्रज्ञांचा अंदाज हा ठोकताळ्यावर अवलंबून असतो. त्याला कोणताही शास्त्रीय आधार नसतो. तर हवामान खात्याचा अंदाज हा शास्त्रशुद्ध असतो.परंतु त्यांनी शास्त्राच्या आधारे परिपूर्ण अंदाज देणे गरजेचे आहे की जेणेकरून नागरिकांना खासगी हवामान शास्त्रज्ञावर अवलंबून राहावे लागणार नाही.