पुणे – झटपट पैसे कमावण्यासाठी युवापिढी वाट्टेल ते करण्यास तयार आहे. नेमकी हीच बाब सायबर भामटे हेरत असून, त्यांनी आता फसवणुकीचा नवा फंडा वापरण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, या टास्क फ्रॉडमध्ये सामान्य युवक नाही, तर चक्क आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लुबाडले जात आहे. या ऑनलाइन फसवणुकीतून आतापर्यंत लाखो रुपयांचा “हात’ या भामट्यांनी “मारला’ आहे.
प्रामुख्याने आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्यांना हे सायबर भामटे गाठतात. सोशल मीडियावरील एखाद्या पोस्टला लाइक मिळवून देण्यासाठी, एखादी पोस्ट कॉपी-पेस्ट करण्यासाठी किंवा एखाद्या पोस्टला लाइक करण्यासाठी सुरुवातील 50 रुपये दिले जातील, असे आमिष दाखवले जाते. विशेषत: एक्स्ट्रा इन्कमच्या शोधात असणारे लोक या भामट्यांचे टार्गेट असतात.
असा चालतो काळा कारभार…
एखाद्या व्यक्तीने जादा पैसे मिळवण्यासाठी या लुटारूंकडे रजिस्ट्रेशन केल्यानंतर सुरुवातीला प्रति पोस्ट 50 ते 100 रुपये दिले जातात. थोड्याच दिवसात हे भामटे वेगवेगळ्या योजनेत गुंतवणूक करुन जादा परताव्याचे आमिष दाखवतात. यातून जादा परतावा मिळेल, या आशेने थोडे-थोडे करुन काही लाखांत गुंतवणूक करण्यास भाग पाडतात किंवा सरळ त्यांच्या बॅंक खात्याचे डिटेल्स मिळवून त्यातून पैसे काढून घेतात.
टास्क फ्रॉडची कारणे…
लोकांवर वेगवेगळ्या कारणांमुळे फसवणूक करण्यासाठी दबाव आणला जातो. लोभ आणि सहज आर्थिक लाभाचे आमिष. बेरोजगारी किंवा स्थिती गमावणे, जुगाराचे व्यसन, आरोग्य समस्या किंवा कर्जफेडीसाठी जे लोक पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतात, ते या भामट्यांच्या जाळ्यात अडकतात.
पुण्यातील सर्वांत मोठी फसवणूक…
लष्करातील 69 वर्षीय निवृत्त कर्नलची 18 दिवसांत तब्बल 2 कोटी 40 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. यादरम्यान “प्रीपेड टास्क’साठी चाळीसपेक्षा अधिक ऑनलाइन व्यवहारांतून त्यांची फसवणूक झाली. या व्यक्तीला सुरुवातीला व्हिडिओ लाइक करणे आणि उत्पादनांसाठी ऑनलाइन रिव्ह्यू देण्यासारखी कामे पूर्ण करण्याच्या बदल्यात पैसे देण्याचा संदेश आला. या प्रलोभनाला ते बळी पडले. “टास्क फ्रॉड’ प्रकरणातील ही पुण्यातील आतापर्यंतची सर्वांत मोठी फसवणूक ठरली आहे.
सायबर भामटे दरवेळी नवनवीन युक्ती अवलंबत असतात. सेक्सॉर्टोशन, जॉब फ्रॉड, शेअर मार्केट फ्रॉड, वीजबिल भरणा फ्रॉड यानंतर आता टास्क फ्रॉडकडे ते वळले आहेत. मागील काही महिन्यांत या प्रकरणातील सर्वाधिक तक्रारी प्राप्त होत आहेत. टेलिग्राम आणि इन्स्टाग्रामवरून सायबर भामटे हे जाळे पसरवत आहेत. आजवरच्या तक्रारींमधील पीडितांमध्ये आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे, असे सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीनल पाटील म्हणाल्या.
फसवणुकीचे प्रमाण वाढतेय…
याप्रकारे मागील काही महिन्यांत जवळपास 25 गुन्हे दाखल झाले आहेत. तर, दररोज तक्रारींची रीघ लागली आहे. या टास्क फ्रॉडच्या जाळ्यात सहकारनगर येथील एका महिलेने तब्बल सव्वा कोटी, तर एकाने तब्बल 80 लाख गमावले आहेत. मात्र, यानंतरही लोक फसले जात आहेत. यासाठी सायबर सेल तसेच माध्यमांतून अनेकदा जनजागृती झाली आहे. तरीही फसणाऱ्यांचे प्रमाण कमी होत नाही