पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची घोषणा
इस्लामाबाद : भारतातील शीख यात्रेकरूंना करतारपूरला जाण्यासाठी पासपोर्टची गरज भासणार नाही आणि 9 नोव्हेंबर रोजी कॉरिडॉरच्या पहिल्या दिवशी त्यांच्याकडून कोणतीही फी आकारली जाणार नाही, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शुक्रवारी जाहीर केले.
“भारतातून करतारपूर येथे यात्रेसाठी येणाऱ्या शीखांसाठी दोन आवश्यक बाबींमध्ये सवलत दिली आहे. या यात्रेकरूंना पासपोर्टची आवश्यकता नसेल. केवळ वैध ओळखपत्र त्यांच्याकडे असावे लागेल. त्याशिवाय त्यांना 10 दिवस आगोदर नोंदणी करावी लागणार नाही. तसेच, उद्घाटनाच्या दिवशी आणि गुरुजींच्या 550 व्या जन्मदिनी कोणतीही फी आकारली जाणार नाही, असे ट्विट खान यांनी केले.
करतारपूर कॉरिडोर पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या नरोवाल जिल्ह्यातल्या आंतरराष्ट्रीय सीमेपासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावरच्या करतारपूर येथील दरबार साहिब आणि भारतातील पंजाबमधील डेरा बाबा नानक मंदिरास जोडेल. भारतीय यात्रेकरूंना गुरुद्वारा दरबार साहिबला व्हिसा शिवय भेट घेता यावी, यासाठी भारत आणि पाकिस्तानने गेल्या आठवड्यात कॉरिडॉरवरील करारावर स्वाक्षर्या केल्या आहेत.
या करारामुळे दररोज 5000 भारतीय यात्रेकरूंना गुरुद्वारा दरबार साहिबला भेट देता येईल. प्रत्येक पर्यटकांकडून 20 डॉलर शुल्क आकारली जाईल, परंतु भारतीय यात्रेकरूंकडून शुल्क न आकारण्याची विनंती भारताने पाकिस्तानला केली आहे. दरबार साहिब इथेच गुरु नानक यांनी आपल्या आयुष्यातील शेवटची 18 वर्षे घालवली होती.