पाकिस्तानच्या मंत्र्याचा अजब दावा
लाहोर :ऐतिहासिक करतारपूर कॉरिडॉरचे उद्घाटन करणे ही लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांचीच कल्पना होती आणि यामुळे भारताला कायमच त्रास होईल, असा दावा पाकिस्तानातील वरिष्ठ मंत्र्याने शनिवारी केला. या कोरिडॉरच्या पुढाकारमागील कल्पना पंतप्रधान इम्रान खान यांची होती, असे त्यांच्या सरकारच्या निवेदनाचे या मंत्र्याने खंडनच केले.
शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव यांच्या 550 वी जयंती साजरी करण्यासाठी भारतीय शीख यात्रेकरूंना व्हिसा-मुक्त प्रवेश मिळावा म्हणून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी 9 नोव्हेंबर रोजी करतारपूर कॉरिडोरचे उद्घाटन केले आहे. कॉरिडॉरचे उद्घाटन करताना खान यांनी तब्बल 12,000 पेक्षा जास्त भाविकांच्या मेळाव्यास संबोधित केले होते, “मला या जागेचे महत्त्व काय आहे याची कल्पनाही नव्हती. मला एक वर्षापूर्वी हे महत्व समजले. मला आनंद आहे की आम्ही आपल्यासाठी हे करू शकलो.’ असे इम्रान खान म्हणाले होते.
करतारपूर कॉरिडोरसाठी पंतप्रधान इम्रान खान यांचा पुढाकार होता, असा दावा पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ सरकारने केला आहे.मात्र पंतप्रधान खान यांचे निकटवर्तीय आणि वाचाळ मानले जाणारे पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद यांनी शनिवारी सरकारच्या या दाव्याला विरोध केला.
करतारपूर कॉरिडॉर उघडल्यामुळे जनरल बाजवा यांनी भारताला केलेली जखम भारताला कायमच लक्षात ठेवावी लागेल, असे ते म्हणाले. जनरल बाजवा यांनी कॉरीडोर उघडत भारतावर जोरदार हल्ला केला. या प्रकल्पाच्या माध्यमातून पाकिस्तानने शांततेचे नवे वातावरण निर्माण केले आणि शीख समुदायाचे प्रेम मिळवले. भारतीय प्रसार माध्यमांनेही जनरल बाजवा यांच्या मुदतवाढीचा मुद्दा चालवला, असे ते म्हणाले.
इम्रान खान यांना आणखी तीन वर्षांचा कार्यकाळ आहे आणि जनरल बाजवा यांनाही सहा महिन्यांची नव्हे, तर तीन वर्षांची मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असे रशीद म्हणाले. जनरल बाजवा हे इम्रान खान सरकारला पाठिंबा देण्यासाठीच असल्याचे त्यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले.
कोणताहे वाद टाळण्यासाठी जनरल बाजवा करतारपूर कोरिडॉरच्या उद्घाटनाच्या समारंभाला उपस्थित राहिले नव्हते. गेल्या वर्षी 28 नोव्हेंबरला झालेल्या भूमिपूजन सोहळ्यात कॉंग्रेस नेते सिद्धू यांनी जनरल बाजवा यांच्या मिठीने वादंग निर्माण केला होता.