दिल्लीतील हवा विषारी झाली आहे. गेल्या काही दिवसांत देशाच्या या राजधानीत प्रदूषण प्रचंड वाढले आहे. सगळीकडे धुलीकणांचे साम्राज्य पसरले आहे. त्यातच दिवाळीत फोडलेले फटाके, वाहनांच्या उत्सर्जनाने प्रदूषणात वाढच होत आहे. हे सगळे असताना पंजाब आणि हरियाणा या शेजारच्या राज्यांनीही दिल्लीचा ताप वाढवला आहे. पिकांचे खुंट अथवा अन्य अनावश्यक बाबी जाळल्या जात असल्यामुळे हवा प्रदूषित होत आहे. त्याचा परिणाम थेट दिल्लीच्या हवेवर होत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पुन्हा भांडणाच्या मोडमध्ये गेले आहेत. त्यांनी प्रदूषणाचा धोका सांगतानाच शेजारच्या या राज्यांवरही तोफ डागली आहे. आता स्थिती इतकी बिकट आहे की आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडूच नका, असे सरकारकडून सांगितले जाते आहे. गेल्या दोन वर्षांपासून नोव्हेंबर-डिसेंबरच्या सुमारास हा प्रकार घडतो आहे.
दिल्ली कशी गॅस चेंबर झाली आहे, याची वर्णने विदेशी माध्यमांत प्रसिद्ध झाली आहेत. तेथे जाणे म्हणजे आपले जीवनमान कमी करून घेण्यासारखे असल्याचे धडक विधानही बाहेरचे पत्रकार करत आहेत. सगळे जग हबकून भारताकडे पाहात असताना भारत मात्र “मला काय त्याचे’, अशा अविर्भावात आहे. आपल्या देशात विराट कोहलीच्या बायकोला कोण चहा देते, मुख्यमंत्री पदावरून कशी जिरवा-जिरवी सुरू आहे, कोण विक्रमी वेळात पक्षांतर करून मंत्रिपदी विराजमान झाला, कोणाच्या चित्रपटाने किती दिवसांत किती व्यवसाय केला अशा सगळ्या सुरस कथा माध्यमांतून तत्काळ झळकत असतात. त्या चवीने वाचल्याही जातात. त्यात आपले हातचे जोडून त्याचे चर्वितचर्वण सुरू राहते. फोडणी दिली जाते. मात्र, आपल्या अस्तित्वाशीच निगडीत असलेल्या विषयांशी कोणालाही देणेघेणे नाही.
मूठभर लोक हातात फलक घेऊन उभे राहतात. जागतिक तापमानवाढीच्या नावाने जागृती करण्याचा प्रयत्न करतात. दोन तासांचा कार्यक्रम झाल्यावर घरी परततात. शालेय विद्यार्थ्यांनाही “इव्हेंट’ म्हणून असेच रस्त्यावर उतरवले जाते. एखादी मूक फेरी निघते. त्यांच्याही हातात फलक असतात. मात्र, त्यावरील गांभीर्य मुलांच्या चेहऱ्यावर कमीच दिसते. शिक्षकही कामाचा भाग म्हणून या मुलांसह रस्त्यावर उभे राहिलेले असतात. एकूण असा थंड कारभार. कारण याला आपल्या लेखी किंमतच नाही. प्रदूषणामुळे आणि या विषारी हवेमुळे आपण रोज कसे तिळ तिळ मरतो आहोत, याचे कोणालाही आकलन झालेले नाही. तसे ते होऊ दिलेले नाही.
राजकारण, क्रिकेट, चित्रपट आणि रिऍलिटी शो यांच्यातच आपले बहुसंख्य नागरिक गुंतले आहेत. ज्यांना हे करायला फुरसत नाही, ते जीवनाची म्हणजेच हातातोंडाची गाठ घालण्याचा अथक संघर्ष करत आहेत. असे सगळे असताना जबाबदारी ज्यांच्यावर सोपवली आहे, ते या विषयावर बोलायलाच तयार नाही. किंबहुना त्यांच्या दृष्टीने हा विषय चर्चेला घेण्याइतपत लायकीचाच नाही. आपण एकतर अगदी इतिहासाबद्दल बोलतो. त्याकरता पाच हजार वर्षे मागेही जातो. तेव्हा कसे आपणच पहिले विमान उडवले वगैरे दाखले देतो किंवा अगदी पन्नास-शंभर वर्षांनंतर आपण कसे महासत्ता बनणार आहोत, त्याबद्दल बोलतो.
वर्तमानकाळात थांबण्याची आपल्याला सवयच नाही. ती आपल्याला नसल्यामुळे आपण दुसऱ्यालाही वर्तमानात विसावू देत नाही. स्थितीचा अंदाज घेऊ देत नाही. यात केवळ नेतेमंडळींचा दोष नाही. माध्यमांकडेही याची जबाबदारी जाते. दिल्ली गॅस चेंबर बनले असताना आपण दिल्लीतल्या विषारी हवेऐवजी तापलेल्या राजकीय हवेवर बोलण्यातच धन्यता मानतो. दिल्लीत आज जे घडतेय ते अचानक झालेले नाही. त्याची सुरुवात कधीच झाली आहे. एकटे दिल्लीच नाही, मुंबई, पुणे, बंगळुरू, हैदराबाद, नागपूर अशी बरीच शहरे दिल्लीच्या रांगेत उभी आहेत.
पूर्वी पाऊस आला की फक्त मुंबई तुंबायची. काही तास तुंबलेल्या मुंबईचे प्रसारण हा इव्हेंट झाला होता. आता संकट आपल्याही दारात आल्याची जाणीव पुणे असो अथवा नाशिक अथवा नागपूर सगळ्याच शहरांना झाली आहे. शहरांतल्या मुख्य रस्त्यांवर माणसे वाहनांसकट वाहून जात आहेत. मात्र, त्यावर किती गांभीर्याने विचार झाला? सरकारला कोणी जाब विचारला? चर्चेला बसण्याची सवड तरी मिळाली का? आता “कौन बनेगा मुख्यमंत्री’चा खेळ आठवडाभर सुरू आहे. नुकताच बंगळुरूतील एका डॉक्टरांचा एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यात त्यांच्याकडे दाखल होणाऱ्या हृदयरोगाच्या रुग्णांचे सरासरी वय घटत चालले आहे. 16 ते 40 या वयोगटातील सरासरी 120 ते 140 जण रोज या डॉक्टरांच्या संस्थेत दाखल होत आहेत. धूम्रपान आणि तंबाखू सेवन या बाबी घातकच आहेत. मात्र, यापैकी कसलेही व्यसन नसणाऱ्यांनाही गंभीर आजार जडत असल्याचे हा अहवाल सांगतो.
भारतात दरवर्षी 12 लाख लोक प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांमुळे प्राणास मुकत असल्याची आणखी एक अधिकृत आकडेवारी सांगते. मृत्यूचे कारण कोणतातरी आजार अथवा अपघात असू शकतो. मात्र, त्या आजाराचे मूळ जे आहे, त्यावर नेमकेपणाने बोट ठेवले जात नाही. हवेच्या शुद्धतेच्या बाबतीत नुकतीच जगभर निदर्शने झाली. पर्यावरणाबाबत गंभीर असलेले बहुतेक देश त्यात सहभागी झाले. मात्र, भारतात त्याचे वारेही शिरले नाहीत. भारतात पर्यावरणाचा मुद्दा उपस्थित करणारा विकासाचा शत्रू समजला जातो. विकास आणि प्रगती कोणाला नको असते? सगळ्यांना ते हवंच आहे. मात्र, ते साध्य करताना आपण काय मूल्य चुकवतो आहोत, त्याचाही विचार करणे क्रमप्राप्त आहे. आज काही मोजकी शहरे गॅस चेंबर झाली आहेत, तर काही होण्याच्या मार्गावर आहेत. अजूनही तातडीने पावले उचलली तर बरेच नुकसान टाळता येऊ शकते.
सशक्त भारताच्या पुढच्या सशक्त पिढीसाठी किमान शुद्ध हवा तरी आपण राखलीच पाहिजे. त्याकरता झाडे लावण्याचा कार्यक्रम साजरा न करता त्याचे उद्दिष्ट जपणे महत्त्वाचे आहे. संख्येत न जाण्यापेक्षा किती झाडे आपण जगवू शकतो, याचा ध्यास घेणे गरजेचे आहे. कॅनडासारख्या देशांनी जनरेट्याचा अंदाज घेत काही लक्ष झाडे जगविण्याचा संकल्प सोडला आहे. न्यूझीलंडसारखे अन्य देशही त्याच मार्गाने जात आहेत. मात्र, आपण केवळ वृक्षतोडीतच धन्यता मानत असू आणि एकूण वनक्षेत्राची आकडेवारी जर न्यायालयांच्याही तोंडावर फेकणार असू तर आपल्याला फार वाट पाहावी लागणार नाही. प्रगतीचा आणि विकासाचा बेधुंद प्रवास सगळ्यांनाच एक दिवस सामूहिक आत्महत्येच्या दिशेने घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही.