मुंबई – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बुधवारी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी योगी आदित्यनाथ काही बॉलिवूड सेलिब्रेटी आणि उद्योजकांशी उत्तर प्रदेशात गुंतवणूक करण्यासंबंधी चर्चा करणार आहेत. बॉलिवूड उत्तर प्रदेशात नेण्यासाठी पहिली बैठक पार पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या कि, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचे मुंबईत स्वागत आहे. पण त्यांनी कितीही प्रयत्न केला, तरी बॉलिवूडला मुंबईपासून वेगळे करणे शक्य नाही. दुधात साखर विरघळल्यासारखे मुंबई आणि बॉलिवूडचे नाते असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. बारामतीमध्ये मतदान केंद्रावर सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
दरम्यान, आज रात्री योगी आदित्यनाथ लखनऊहून मुंबईसाठी रवाना होतील. २ डिसेंबरला बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा कार्यक्रम संपल्यानंतर योगी आदित्यनाथ उद्योजक आणि बॉलिवूड सेलिब्रेटींना उत्तर प्रदेशात गुंतवणुकीसाठी आमंत्रित करतील. या बैठकीत दिग्दर्शक सुभाष घई, बोनी कपूर, टी सीरिजचे भूषण कुमार, झी स्टुडिओचे जतीन सेठी, नीरज पाठक, रणदीप हुडा, तिगमांशू धुलिया, जिमी शेरगिल, तरण आदर्श, कोमल नाहता आणि राजकुमार संतोषी उपस्थित राहतील, अशी माहिती अधिकाऱ्याने फ्री प्रेस जर्नलला दिली आहे.
सप्टेंबरमध्ये देशाला एका चांगल्या फिल्म सिटीची गरज असून आम्ही उत्तर प्रदेशमध्ये एका भव्य फिल्म सिटीची निर्मिती करणार असल्याचे ते म्हणाले होते. योगी आदित्यनाथ यांनी फिल्मसिटी उभारण्यासाठी नोएडा जवळील यमुना एक्स्प्रेसवेवर असणारी १००० एकर जागाही राखून ठेवली आहे. ही फिल्मसिटी बॉलिवूडपेक्षाही मोठी असेल, असे योगी आदित्यनाथ यांचे म्हणणे आहे.