आदळआपट करून विरोधकांनी उर्जा वाया घालवू नये
मुंबई – अजूनपर्यंत मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा अद्याप आलेला नाही. जो मुद्दा आमच्यासमोर आलेला नाही त्यावरून आदळआपट करण्याची गरज नाही. ज्यावेळी मुद्दा समोर येईल त्यावेळी सर्व बाजू तपासून घेतल्या जातील, अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. मराठा आरक्षणाबाबत सरकार कोर्टात पूर्ण ताकदीने लढतंय. धनगर आरक्षणाबाबत सरकारची भूमिका मांडली आहे. त्यामुळे जे आदळआपट करीत आहेत त्यांनी आपली ऊर्जा वाया घालवू नये. मुद्दा येईल तेव्हा त्यासाठी ती राखून ठेवावी, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी विधानभवनात पत्रकार परिषदेत आपली विविध विषयांवर भूमिका स्पष्ट केली. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी विधानपरिषदेत मुस्लिम आरक्षणाबाबत घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर विचारले असता, अद्याप मुस्लिम आरक्षणाचा विषयच सरकारसमोर आलेला नाही. त्यावर मी किंवा शिवसेनेने कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. तो मुद्दा आल्यानंतर त्याची वैधता तपासून निर्णय घेऊ. जेव्हा येईल तेव्हा त्याबाबत विचार करण्यात येईल. त्यामुळे या विषयावर आतापासूनच कोणी आदळआपट करण्याची गरज नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
यावेळी गोवंश संदर्भात राज्य सरकारने निधी कमी केल्याचा आरोप भाजपकडून केला जात असल्याचे पत्रकारांनी विचारले असता, भाजपला पहिले हे सांगावे की, सर्व राज्यांत हा कायदा लागू करावा. गोव्यामध्ये हा कायदा लागू करावा, मग माझ्याशी बोलावे, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले. कॅगचा अहवाल कधी सादर करणार या प्रश्नावर बोलताना कॅगचा अहवाल जाहीर करण्याच्या आधी राज्यपालांच्या परवानगीची आवश्यकता असते. नियम किंवा प्रथा बघून तो सभागृहसमोर सादर करू. कोणताही अहवाल जनतेच्या हिताचा असेल तर तो जनतेसमोर आला पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
7 मार्चला अयोध्येला जाणार
राष्ट्रवादी व कॉंग्रेससोबत युती केली म्हणून देवाचे दरवाजे बंद झालेले नाहीत. त्यामुळे येत्या 7 तारखेला अयोध्येला जाणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. अयोध्या दौऱ्यावरून राजकारण केले जात असल्याच्या टीकेचाही समाचार घेतला. देवाचं दर्शन घेण्यात राजकारण कुठून आले. देव हा देव असतो. ज्या मंत्र्यांना सोबत यायचं असेल ते येतील. देवाचे दरवाजे सर्वांसाठी खुले असतात. त्यामुळे मित्र पक्षातील सदस्य माझ्यासोबतही येऊ शकतात, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
शेतकरी कर्जमुक्तीबद्दल समाधान!
उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमुक्तीबद्दल समाधान व्यक्त केले. डिसेंबरच्या अधिवेशनात कर्जमुक्ती जाहीर केली. त्यानंतर 24 फेब्रुवारीला सरकारने पहिली 68 गावांतील 15 हजार शेतकऱ्यांची, तर 28 फेब्रुवारीला उर्वरित 21 लाख 81 हजार कर्जखात्यांची दुसरी यादी जाहीर केली. आजपर्यंत 10 लाख शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण केलेले आहे. त्यानंतर कालपासून सात ते सवासात लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जाचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांची उर्वरित यादी लवकरात लवकर जाहीर होईल, असे सांगतानाच सरकारवर विश्वास ठेवत दोन महिने संयम ठेवणाऱ्या शेतकऱ्यांनाही मुख्यमंत्र्यांनी धन्यवाद दिले.
फसल विमा योजना का फसली?
शेतकऱ्यांसाठी जे काही करता येईल ते हे सरकार करतेय. शेतकरी आपल्या पायावर कसा उभा राहील ते आम्ही बघतो आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगताच टीका करणाऱ्या विरोधकांनाही टोला लगावला. पहिल्यांदा पंतप्रधान फसल विमा योजना का फसली? असा सवाल करत फसल हा शब्द मराठी की हिंदी माहीत नाही, पण पंतप्रधानांची शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची योजना आहे. ती योजना कधी येतेय, शेतकरी सन्मान योजना कशी चालली आहे ते बघत आहोत. ते एकदा झालं की त्याहून चांगलं काही करता येईल का, हेही बघू. शिवभोजन योजनेची व्याप्ती आम्ही वाढवत आहोत. आम्ही कोणतीही घिसाडघाई करीत नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.