हिमांशू
शेतात कष्ट करूनही तुझ्या डोक्याला ताप, अरे बळीराजा नको करू आत्महत्या… पैसे नसूनही शाळेत शिकवतो लेकरं, कसे उन्हात करतात शेती, पीक उगवणी मिळतात पैसे, शेती करूनही तुझ्या हाताला फोड… अरे बळीराजा नको करू आत्महत्या… हा मजकूर “कविता’ या सदरात बसणारा आहे का? बहुतांश लोक म्हणतील “नाही’! ना वृत्त, मात्रा, छंद… ना यमक, ना अंत्ययमक आणि मुक्तछंद म्हणावा तरी बराच ठिसूळ वाटणारा हा मजकूर, होय ना? कवितेत वास्तव वगैरे गोष्टी कशाला शोधायच्या? कविता म्हणजे आत्मसंवाद. कुणाला ऐकू जाणार नाही अशा आवाजात हा संवाद साधावा, नंतर छापावा आणि प्रसिद्ध करावा. जगण्यात काव्यात्मकता असतेच, ती शोधावी. आशयाच्या गडद डोहात खोल उतरावं, तळ ढवळून काढावा, उत्तम शब्दयोजना करावी आणि मग आकर्षक मांडणी करावी.
कविता लोकांसमोर वाचली तर वाक्यावाक्याला टाळी पडावी, ऐकणाऱ्यांनी सेकंदा-सेकंदाला “वाहवा, वाहवा’ म्हणून दाद द्यावी. कवितेची बांधणी मात्रांमध्ये केली असेल तर सुंदर चाल लावावी, सुरेख वाद्यमेळ जमवावा… अगदी ऐकत राहावंसं वाटलं पाहिजे. हल्ली रेकॉर्डिंगचं तंत्र किती सुधारलंय! इलेक्ट्रॉनिक वाद्यंही आशय गडद करतात. कवितेचं हे रूप तर खूपच मोहक. मती गुंग करणारं… सर्वकाही कबूल आहे; पण तरी वर दिलेला मजकूर वारंवार लक्ष वेधून घेणारा… विनाकारणच त्रास देणारा!
कारणही तसंच आहे. इयत्ता तिसरी म्हणजे असं कितीसं वय असणार? फार तर आठ-नऊ वर्षांचं. या वयातल्या मुलाच्या पेनातून ओघळलेला हा मजकूर. तो मुलगा याला कविताच म्हणतो. शाळेत कार्यक्रम होता काव्यवाचनाचा. मराठी राजभाषा दिनानिमित्त. सहभागी विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेली कविता वाचून दाखवायची होती. प्रशांत नावाच्या या अल्लड पोरानं सभोवार जे दिसतंय तेच लिहून काढलं. त्यालाच “कविता’ असं नाव दिलं.
काय करणार ही पोरं तरी! इंग्रजीमिश्रित मराठी अर्थात “मिंग्लिश’ त्यांच्यापर्यंत अजून पोहोचलेलीच नाही. पाथर्डीसारख्या दुष्काळी तालुक्यात राहणारी ही पोरं. माती, परिस्थिती आणि भाषा जशी आहे तशी स्वीकारलेली. कदाचित ही पोरं साजरा करतात तोच खरा मराठी दिन असेल. म्हणूनच चिमुकल्या प्रशांतनं जे लिहिलंय ते “कविता’ म्हणून स्वीकारायचंय. जे घडत नाही ते कवितेत लिहिलं जातं किंवा जे घडू नये असं वाटतं, ते कवितेतून सांगितलं जातं, असं कदाचित या पोराला वाटत असेल. साधा, सरळ संदेश दिला त्यानं… बळीराजा, आत्महत्या करू नकोस. बापाच्या हाताला आलेले फोड त्यानं बघितले असतील. तसेच्या तसे उतरले कवितेत. खस्ता खाऊन पोराला शिकवणारा बापच कवितेचा हिरो झाला.
प्रशांत… “नको करू आत्महत्या,’ हे तू तुझ्या वडिलांना उद्देशूनच लिहिलं होतंस ना रे? नाही ना ऐकलं त्यांनी? तुझ्या कवितेचं शाळेत कौतुक झालं; पण त्याच रात्री तुझ्या वडिलांनी विष पिऊन हे जग सोडलं… सततच्या नापिकीला कंटाळून! नको असा खचून जाऊ पोरा. खचून जायची परवानगीच कुठाय काळ्या आईच्या लेकरांना? उपाशीपोटी झोपावं लागलं तरी सकाळी उठून लढावंच लागणार. तुझे वडील गेले; पण तुझी कविता अजरामर झालीये, प्रशांत!