वाघोली – वाघोली-केसनंद या राज्य मार्गाच्या संथ गतीने सुरू असलेल्या कामामुळे वाघोली तसेच पंचक्रोशीतील नागरिक त्रस्त झाले आहेत. या रस्त्यावरील अपघातांमध्ये दररोज वाढ होत आहे. अनेक वाहनांचे देखील नुकसान या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे होत आहे. येत्या आठ दिवसांत या रस्त्याची दुरवस्था थांबवली नाही तर भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजप युवा नेते संदीप सातव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.
रस्त्याचे काम साधारणपणे 150 मीटर अंतरापर्यंत अत्यंत संथ गतीने सुरू आहे. तसेच रस्त्याच्या कामाचा दर्जा देखील ढासळलेला आहे. झालेले काम देखील निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप संदीप सातव यांनी केला आहे. नागरिकांना ये-जा करण्यासाठी कोणत्याही प्रकारची खड्डे बुजवले गेले नसल्याने खड्ड्यांमधून नागरिकांना आपली वाहने तारेवरची कसरत करून काढावी लागत आहेत. रस्त्यासाठी ठेकेदाराने बेकायदेशीरपणे एका खासगी ठेकेदाराची नेमणूक केली आहे. त्याच्याकडून हे काम सुरू असून वाहतूककोंडीमध्ये मोठ्या प्रमाणात भर पडली आहे.
याशिवाय रस्त्याच्या नियंत्रणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचा एकही अधिकारी काम चालू असताना उपस्थित राहात नसल्याचे दिसून येत आहे. रात्री-अपरात्री प्रवास करताना कोणत्याही रस्त्याच्या ठिकाणी सुरक्षिततेचे फलक तसेच योग्य ते उपाय योजना करणे आवश्यक असताना देखील ठेकेदारांने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे रात्री अपरात्री अपघातांचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे हे काम त्वरीत पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
भाजपने आंदोलन देखील केले होते…
या रस्त्यासाठी हवेली तालुका क्रीडा आघाडी भाजपचे अध्यक्ष विजय जाचक, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष गणेश सातव यांच्या नियोजनाखाली भाजपने काही दिवसापूर्वी आंदोलन देखील केले होते याप्रसंगी संदीप सातव, पंचायत समिती सदस्य शाम गावडे, गणेश कुटे,शरद आव्हाळे, महिलावर्ग देखील मोठ्या संख्येने उपस्थित होता.
“वाघोली-केसनंद रस्त्याचे काम सुरू असून सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. पण तातडीने त्या करण्यात येतील.”
– तुकाराम देवकर, अधिकृत ठेकेदार
“रस्त्याचे मी काम घेतले असून प्रत्येक दोन दिवसाला खड्डे बुजवले जात आहेत. येत्या दहा दिवसांत रस्त्याच्या दुसऱ्या बाजुचे काम करण्यात येणार आहे.” – किरण उंद्रे, ठेकेदार
“वाघोली-केसनंद रस्त्यासाठी किरण उंद्रे ठेकेदार आहेत की काय माहित नाही. देवकरच रस्त्याचे अधिकृत ठेकेदार आहेत. रस्त्यावरील खड्डे बुजवले जातील तसेच वाहतुक व सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात येतील.”
– सचिन देशमाने, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग