इस्लामाबाद – पाकिस्तानात मुलींच्या अपहरणांमध्ये अचानक वाढ झाली असून या मुली एकतर वेश्याव्यवसायासाठी विकल्या जाजात किंवा त्यांना आखाती देशांमध्ये विकले जाते, असे पाकिस्तानातील प्रसिद्धी माध्यमांनीच म्हटले आहे.
सरीम बारनी ट्रस्टने याबाबतची माहिती दिली आहे. गेल्या वर्षभरात कराचीमध्ये बेपत्ता झालेल्या मुलांच्या तब्बल 800 तक्रारी दाखल झाल्या आहेत. यापैकी 27 टक्के म्हणजे 234 या मुली आहेत.
2021 या वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये 233 मुलांच्या बेपत्ता होण्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. यामध्ये 74 मुली असून बेपत्ता मुलांमध्ये हे प्रमाण वाढून 31 टक्के झाले आहे. बेपत्ता झालेली अनेक मुले नंतर सापडली आहेत. पण अजूनही न सापडलेल्या मुलांचे प्रमाण देखील खूप जास्त आहे.
बेपत्ता झालेल्या मुलांच्या तपासामध्ये पोलिसांकडून सहकार्य केले जात नाही, अशी टीका या स्वयंसेवी संघटनेने केली आहे. कराची व्यतिरिक्त पंजाब सरायकी पट्ट्यात आणि रहिम यार खान जिल्ह्यातही हे प्रमाण लक्षणीय आहे. दारिद्रयामुळे अनेक पालक आपल्या मुलींच थेट दलालांना आखाती देशात वेश्याव्यवसायासाठी विक्री करत असल्याचेही या अहवालात म्हटले आहे.
महिलांविरोधातील अत्याचाराच्या घटना वाढत असताना राजकीय नेत्यांकडून अत्यंत बेजबाबदार विधाने केली जात असतात. मोबोइल फोनच्या गैरवापरामुळेच मुलींविरोधातील लैंगिक गुन्हे घडत असल्याचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे.