ऑलिम्पिक पात्रता कालावधीवर नाराजी
टोकियो – जपानमधील टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा करोनामुळे एक वर्ष पुढे ढकलण्यात आली. मात्र, आता यामुळे स्पर्धेसाठी आणखी काही खेळाडूंना पात्र ठरण्याची नामी संधी असली तरीही त्या पात्रता स्पर्धांचा कालावधी लक्षात घेतला तर त्याचा सरळ सरळ फटका भारतीय खेळाडूंनाच बसणार आहे, असे मत भारतीय अथलेटिक्स संघाचे उप मुख्यप्रशिक्षक राधाकृष्णन नायर यांनी व्यक्त केले आहे.
करोनाच्या वाढत्या धोक्यामुळे जागतिक ऍथलेटिक्स संघटनेने टोकियो ऑलिम्पिक पात्रतेसाठीचा कालावधी येत्या 30 नोव्हेंबर 2020 पर्यंतच राखला आहे. हा निर्णय भारतीय खेळाडूंसाठी विपरीत ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पात्रतेचा 6 एप्रिल ते 30 नोव्हेंबरपर्यंतचा अवधी स्थगित केला आहे. या कालावधीदरम्यान कोणत्याही स्पर्धेतील कामगिरी टोकियो ऑलिंपिकला पात्र ठरण्यासाठी ग्राह्य धरली जाणार नाही. तसेच, जागतिक क्रमवारीसाठीही या कामगिरीचा विचार होणार नाही.
करोनामुळे झालेली स्थिती पूर्वपदावरआल्यावर येत्या 1 डिसेंबरपासून खेळाडूंना ऑलिंपिकसाठी पात्र होता येणार आहे. त्यामुळे भारतीय खेळाडू नाराज झाले आहेत. देशांतर्गत स्पर्धेतून ऑलिंपिक पात्रता मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न होता. दुसरीकडे लॉकडाउनमुळे या स्पर्धेचे वेळापत्रकही बदलण्यात आले आहे. मग हे खेळाडू पात्रता कशी मिळविणार असा सवालही त्यांनी केला आहे.