-विनोद मोहिते
इस्लामपूर (प्रतिनिधी) : इस्लामपूर शहरातील कोरोना मुक्त झालेल्या मणेर कुटूंबातील १४ जणांचे त्यांचे घरी आगमन होताच नागरिकांनी व प्रशासनाने टाळ्या वाजवत उस्फूर्तपणे स्वागत केले. तणावात असणारे मणेर कुटुंब स्वागताने भारावून गेले. ” कोरोनाला हरवून आलेले आपण हीरो आहात,आपले स्वागत आहे.” असे म्हणतात मणेर कुटुंबाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.
२२ मार्च पासून इस्लामपूर शहरात टप्या टप्याने कोरोना रुग्ण सापडल्याने तणाव होता. हळू हळू बाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण झाले होते. मिरज येथे उपचार घेवून सर्व २५ जण कोरोना मुक्त झाले आहेत. यापैकी पूर्ण मुक्त झालेल्या मणेर कुटुंबातील चौदा सदस्यांचे आज त्यांच्या राहत्या घरामध्ये आगमन झाले.
गांधी चौक परिसरातील त्यांच्या निवासस्थानी नगरसेवक अमित ओसवाल, माजी नगरसेवक कपिल ओसवाल, राष्ट्रवादीचे पदाधिकारी आयुब हवलदार, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी प्रज्ञा पवार, उपमुख्यअधिकारी प्रमिला माने, आरोग्य विभागाचे साहेबराव जाधव, मुस्लिम समाजातील नेत्यांनी त्यांचे स्वागत केले.
इस्लामपूर शहरातील मणेर कुटुंब कोरणा मुक्त झाल्याने शहराला दिलासा मिळाला आहे. शहरातील दत्त खडी परिसरात असणाऱ्या इन्स्टिट्यूट कोरंटाईन मधून १४ जणांना घरी सोडण्यात आले. दरम्यान सकाळच्या सत्रात मणेर कुटुंब वास्तव्यास असणाऱ्या घराला निर्जंतुक करण्यात आले. नगरपालिका प्रशासनाने संपूर्ण परिसर निर्जंतुक स्वच्छ केला होता. यल्लमा चौक परिसरातील श्री गणेश नवरात्र उत्सव मंडळाच्या रुग्णवाहिकेतून मणेर कुटुंबातील सदस्यांनी गांधी चौक परिसरातील निवास्थानी प्रवेश करताच सर्वांनी टाळ्या वाजवत त्यांचे स्वागत केले.