श्रीगोंदा – माजी आमदार राहुल जगताप आणि नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे या श्रीगोंद्याच्या दोन्ही “दादां’मधील राजकीय दरी प्रचंड वाढली असून त्यांच्यामध्ये आता उघड राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर येथील छत्रपती शिवाजी खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीतील पाडापाडीच्या तक्रारी थेट राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या दरबारात मांडण्यात आल्या आहेत.
संघाच्या निवडणुकीत नागवडे-जगताप गट एकत्र आले असले तरी त्यांच्यात अंतर्गत धुसफूस कायम आहे. त्यात संघाच्या निवडणुकीत झालेल्या पाडापाडीने नागवडे-जगताप यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, दत्तात्रय पानसरे आणि आदेश यांनी रविवारी (दि.12) पुण्यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीत संघाच्या निवडणुकीतील नागवडे-भोस समर्थकांच्या पराभवाचा ठपका ठेवत माजी आमदार राहुल जगताप यांच्या तक्रारींचा पाढा वाचण्यात आल्याचे समजते.
संघाचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे तर उपाध्यक्षपद कॉंग्रेसला देण्याचा निर्णय निवडणूकपूर्व बैठकांमध्ये झाल्याचे या नेत्यांनी पवारांना सांगितले. त्यातच जिल्हा बॅंकेच्या अध्यक्ष निवडीतील “मुद्द्या’चे आयते कोलीत या मंडळींच्या हाती लागले. यावेळी अजित पवार यांनी राहुल जगताप यांना फोन करण्याचे टाळून राष्ट्रवादीचे नेते घनश्याम शेलार व बाळासाहेब नाहाटा यांना फोन केले. “श्रीगोंद्यात काय चालले आहे? असा सवाल करीत “जे चालले आहे ते बरोबर नाही’, असे सांगत ठरल्याप्रमाणे संघाचे उपाध्यक्षपद कॉंग्रेसला देण्याच्या सूचना पवारांनी या दोन्ही नेत्यांना केल्याचे समजते.
माजी आमदार राहुल जगताप देखील पवार यांच्या भेटीसाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. आज (दि.13) रात्री उशिरा पवार आणि जगताप यांची भेट होणार आहे. या भेटीत काय चर्चा होते ते पाहणे राजकीयदृष्ट्या महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, बाळासाहेब नाहाटा यांनी संघाच्या पदाधिकारी निवडीत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष दोन्ही राष्ट्रवादीचे करण्यासाठी “स्ट्रॅटेजी’ राबविली असून विरोधी गटाचा एक संचालक त्यांनी गळाला लावला आहे.
कॉंग्रेस-राष्ट्रवादीने एकत्रित काम करण्याच्या सूचना अजित पवार यांनी श्रीगोंद्यातील नेत्यांना यापूर्वी अनेकदा दिल्या आहेत. श्रीगोंद्यातील सद्यःस्थितीबद्दल राष्ट्रवादीत अस्वस्थता असल्याची चर्चा आहे. श्रीगोंद्याच्या दोन्ही “दादां’च्या वादावर बारामतीचे “दादा’ काय तोडगा काढणार ? पुन्हा दोघांना एकत्र आणणार की कोणा एकावर निशाणा साधणार ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.