मुंबई – “ज्या कार्यकत्यांनी निवडून दिले. विधिमंडळात जाण्याची संधी दिली. त्या लोकांना न विचारत तसेच पक्षाला विचारात न घेता, जो विचार आपल्याला मान्य नाही त्यांच्यासोबत जाणे योग्य नाही, हे मला कदापी मान्य नाही’, असा घणाघात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केला. तसेच आज संकट खूप आहेत. मात्र, तुमची साथ असल्यास अजिबात डगमगण्याची काळजी नाही, अशी सादही त्यांनी कार्यकर्त्यांना घातली.
शरद पवार बोलताना पुढे म्हणाले की, काही लोकांचा आज मेळावा झाला. त्या मेळाव्याला माझा फोटो होता. गुरू म्हणायचे, पांडुरंग म्हणायचे. आणि माझ्याकडे दुर्लक्ष झाले असे म्हणत आरोप करायचा, याला काही अर्थ नाही. त्यांच्या मेळाव्यात मी नकार देऊनही सर्वात मोठा फोटो माझा होता. कारण, त्यांना माहित आहे की, त्यांचे नाणे खणखणीत नाही.
माझा फोटो वापरल्याशिवाय त्यांचे नाणे खणखणीत वाजणार नाही. यावेळी बोलताना पवारांनी छगन भुजबळ यांचाही सडकून समाचार घेतला. “पक्षाची प्रॉपर्टी आहे ती काही लोक ताब्यात घेतात. पक्ष आमचा आहे, घड्याळ आमचे आहे असा दावा करतात. तुम्हाला आज स्पष्ट सांगतो की. चिन्ह कुठेही जाणार नाही आणि जाऊ देणार नाही,’ असेही पवार यांनी स्पष्ट केले.
राज्यकर्त्यांची फळी उभारली
24 वर्षांपूर्वी या मुंबई शहरात तुम्हा सर्वांच्या उपस्थितीत जन्म झाला. शिवाजी पार्कवर लाखोंची सभा झाली, आज चोवीस वर्षे झाली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेतृत्वाची फळी निर्माण करण्यात राष्ट्रवादीला यश आले. त्यामुळे कोणी आमदार, खासदार, मंत्री झाले. अनेक मंत्रीमंडळात काम करायची संधी झाली. सामान्य कुटुंबातील व्यक्ती राज्य कसा चालवू शकतो, हे दाखवून दिले. या माणसाच्या शेवटच्या माणसाच्या जीवनात प्रकाश कसा येईल, यासाठी पक्ष काम करत आहे, असे शरद पवार म्हणाले.
शिवसेना-भाजपच्या हिंदुत्वात फरक
शिवसेनेत गेलो तेव्हा आम्ही भाजपसोबत गेलो तर वाईट काय? त्यासाठी शिवसेनेची भूमिका समजून घेतली पाहिजे. या दोन्ही पक्षात फरक आहे. त्यांच्यातील हिंदुत्व हे सर्वांना घेऊन जाणारे. पण भाजपचे हिंदुत्व मनूवादी, विषारी, विभाजन करणारे आहे. असे शरद पवार म्हणाले. त्यांना सत्तेपासून बाजूला करणे आणि राष्ट्रवादी पक्ष मजबूत करणे गरजेचे आहे. हे सर्व कार्यकर्त्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. दुसरे म्हणजे महिलांना संरक्षण मिळत नाही. अशा राज्यकर्त्यांना दूर करणे हे आपले काम आहे. जे गेले त्यांची चिंता करू नका, त्यांना सुखाने राहू द्या, त्यांच्याबद्दल काही कटुता नाही. नवीन नेतृत्वान पिढी तयार करू.