सातारा – करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सातारा जिल्ह्यात उद्यापासून कडक लाॅकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्याविरोधात नागरिकांनी दंड थोपटले असून एडवोकेट राजगोपाल द्रविड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर पत्र लिहिले आहे.
पत्रात पुढील मुद्दे मांडण्यात आले आहेत…
१. लॉकडाऊन हा विषय आपणास किंवा नागरिकांस नवीन नाही. याचे काय परिणाम झाले आहेत, हे देखील आपणास माहित आहे. मागील वर्षी जेव्हा अचानकपणे मा. पंतप्रधानांनी लॉकडाऊन घोषित केला, तेव्हा याबाबत कोणतीच कल्पना नसल्याने जनतेने गुमान सहन केले. त्यानंतर मिडिया आणि राज्य सरकारे यांनी याबाबत टीका केल्याने केंद्र सरकारने ‘ लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय ठेवा ’ अशा सूचना केल्या. मात्र, त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून महाराष्ट्र सरकार आणि त्या अनुषंगाने आपण लॉकडाऊन जाहीर केला आहे. या लॉकडाऊनमुळे खरोखरीच रुग्णसंख्या आटोक्यात आणली आहे काय, याचा कोणीच विचार केलेला दिसत नाही. केवळ ‘कोरोना’ ला महामारी किंवा साथरोग घोषित करून अनागोंदी सुरु आहे आणि यास प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपण जबाबदार आहात.
२. आपण जिल्हाधिकारी आहात. ‘कायदा आणि सुव्यवस्था’ राखण्यासाठी कोरोनाला ‘आपत्ती’ समजून आपण लॉकडाऊन जाहीर केला आहे. महाराष्ट्रातील जनता सूज्ञ आहे, कोरोना आजाराविषयी भरभरून वाचल्याने नागरिकांचा एक दिवसही या विषयाखेरीज जात नाही, तेथे मुद्दामहून नागरिकांना दुकाने बंद करायला लावून आणि त्यांची वाहने जप्त करून, काय साध्य केले जात आहे, असा महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित होत आहे.
३. या लॉकडाऊनमुळे सामान्य लोकांचे झालेले हाल, आपल्याला सरकारी अधिकाऱ्याच्या ऐषोआरामात असल्याने जाणवलेले नाही, हे स्पष्ट दिसून येते. जेथे हातावर पोट असणारे भाजीविक्रेते, किरकोळ दुकानदार, फिरते विक्रेते, कामगार आपली सरकारी-पालिका गाडी आली कि जीव मुठीत घेवून पळतात, आणि पालिकेची गाडी आल्यावर जेथे भाजी हिसकावून घेवून जप्त केली जाते, तेथे आपण कोणती ‘ कायदा-सुव्यवस्था’ राखत आहात ?
४. मागील वर्षी ‘लॉकडाऊन’ वर प्रचंड टीका करणारी मिडिया यावेळी त्यांच्या माध्यमातून सरकार आणि प्रशासनावर विरोध करायचे सोडून कसे लोक बोळाबोळातून भाजी विकत आहेत, याचेच फोटो प्रकाशित करून पोलिसांनी किती दंड वसूल केला, किती गाड्या जप्त केल्या, याचेच चित्र रंगवीत आहेत. कोणालाच जनतेविषयी कळवळा नाही. जेथे भाजीविक्रेत्यावर पोलीस दंडुका उचलतात आणि मिडिया त्याचे समर्थन करते, तेथे खरोखरीच आपण योग्य प्रशासन चालवीत आहात का असा प्रश्न पडतो.
५. जसे रोज किती रुग्णसंख्या आहे, हे प्रकाशित करता तसे जिल्ह्यातील कोरोना सेंटर/ हॉस्पिटल मध्ये आज सरकारने किती खर्च केला, त्याचे आकडे का प्रसिद्ध केले जात नाहीत. कोरोनासाठी जर कोणते औषधच नाही तर लाखो रुपये कसे हॉस्पिटल घेते, सरकारी वैद्यकीय कल्याणकारी योजनांची माहिती तथा अंमलबजावणी का केली जात नाही, हॉस्पिटल्सचे दरमहिना ऑडिट का चेक केले जात नाही, कोरोनाने मृत्यू असे जर सांगितले तर खरोखरीच तो कोरोनाने मरण पावला का औषधांच्या अतिवापराने दगावला, असे प्रश्न आपण सोडाच पण मिडिया देखील उपस्थित करीत नाही.
६. भारतीय संविधानाने लोकांना जगण्याचा अधिकार दिलेला आहे. हा मुलभूत अधिकार आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी देण्यात आलेली मार्गदर्शक तत्त्वे लोक पाळत आहेत, अशावेळी लॉकडाऊन करून आपण नागरिकांच्या मुलभूत हक्कांची जाणूनबुजून पायम्मली करीत आहात. नियमांचे पालन होत आहे कि नाही, इतकेच आपण पाहू शकता, मात्र लॉकडाऊन करून लोकांकाढून त्यांची रोजीरोटी काढून घेवू शकत नाही. आम्ही भारताचे नागरिक आहोत. आम्ही मतदान करतो आणि लोकशाहीचा मान राखतो. शासन, लोकप्रतिनिधी हे जनतेचे सेवक आहेत आणि जनतेची सूचना त्यांनी पूर्ण केलीच पाहिजे. जनतेला तुम्हास जाब विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे. याच अधिकाराचा वापर करून आपणाला सूचित करण्यात येते कि, सातारा जिल्ह्यातील लॉकडाऊन आपण त्वरेने मागे घ्यावा.
७. प्रस्तुत गंभीर सूचना सोशलमिडियावर प्रसृत करून नागरिकांना आवाहन करण्यात येते कि, आपल्या मुलभूत हक्कांसाठी लढा देण्याची हीच वेळ आहे. प्रशासन लोकशाही तत्त्वावर चालते आणि लॉकडाऊनमुळे झालेले-होत असलेले नुकसान आपल्याला कोणीही अधिकारी, लोकप्रतिनिधी भरून देणार नाही. यास्तव, नागरिकांनी लॉकडाऊनचा जाहीर निषेध करावा आणि आपली दुकाने उघडावीत. सरकार आपल्याला अटक करू शकत नाही आणि जाब देखील विचारू शकत नाही. कोरोनासाठी आपली सुरक्षा आपल्याच हाती आहे. सरकारविरुद्ध आपण बोलत नाही म्हणून आपली लॉकडाऊनला मूकसंमती आहे याचा केवळ गैरफायदा घेतला जात आहे, त्यामुळे लॉकडाऊनला बळी पडू नका.
८. लोकप्रतिनिधींना देखील आवाहन करीत आहोत कि, जनता हा आपला मतदारसंघ आहे. जनतेच्या जीवावर तुम्ही अवलंबून आहात. कोरोनापेक्षा स्वाईन फ्लू, मलेरिया, डेंग्यू, इबोला हे आजार भयंकर आहेत आणि त्यामुळे त्याची मृत्यूसंख्यादेखील कोरोनापेक्षा अधिक आहे. मतदार असलेल्या जनतेला लॉकडाऊनला साथ देवून भुकेने मारायचे का केवळ ‘कोरोना’ जप करून लोकांना कसे वाचवले, याचा जप करायचा, हे आपल्या विवेकाधिष्टीत बुद्धीवर अवलंबून आहे.
९. प्रस्तुत गंभीर सुचनेची दखल आपल्याला घ्यावीच लागेल अन्यथा लॉकडाऊनमुळे जनता मृतवत झाल्याने तुम्हाला प्रशासन कसे चालवायचे, अशी गंभीर वेळ येईल. लोकांचा अंत पाहू नका आणि लोकांना कायदा हातात घ्यायला लावू नका.