नवी दिल्ली – दिल्लीतील लसींचा साठा संपल्याने या शहरातील सर्व चारशे लसीकरण केंद्रांवरील 18 ते 44 वयोगटातील लसीकरण थांबवावे लागले आहे, अशी माहिती दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी आज दिली. 45 वर्षांपुढील लोकांसाठीच्या लसीकरणात कोवॅक्सिनचीही लस उपलब्ध नसल्याने त्या केंद्रांचेही लसीकरण थांबवावे लागले आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले की, लोकांना करोनापासून वाचवायचे असेल तर लसीकरण हाच एकमेव मार्ग आहे पण सध्या केंद्र सरकारकडून लसीच उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. विदेशातून लस आयात करण्याचा आम्ही प्रयत्न केला पण थेट राज्य सरकारांना या लसी देण्यास विदेशी उत्पादकांनी नकार दिला आहे. त्यामुळे दिल्ली सरकारची सर्वच बाजूने कोंडी करण्यात आल्याने आम्हाला लसीकरण करण्यास मर्यादा येत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
लसींना मंजुरी देण्याबाबतच्या केंद्र सरकारच्या निर्णयावरही त्यांनी टीका केली. ते म्हणाले की, मागच्यावर्षी भारत सरकारने स्पुटनिक लसीला अनुमती नाकारली होती; पण आता अचानक त्यांना अनुमती देण्यात आली आहे. हा नेमका काय प्रकार आहे असा सवालही त्यांनी केला आहे.