नवी दिल्ली – करोनाच्या आपत्तीच्या काळात सरकारी पातळीवरून जी ढिलाई झाली त्यामुळे भाजप सरकारची प्रतिमा मलिन झाली असून त्याचा आगामी काळात उत्तरप्रदेश सारख्या महत्त्वाच्या राज्यात होणाऱ्या निवडणुकीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या स्थितीवर चर्चा करण्यासाठी काल रात्री दिल्लीत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली. त्या बैठकीला पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा हेही उपस्थित होते.
उत्तरप्रदेशात पुढील वर्षी निवडणूक होत आहे. त्यापूर्वी सरकारच्या प्रतिमा सुधारण्याच्या उपायांविषयी यावेळी प्रामुख्याने चर्चा झाली. सर्व साधनसंपत्ती असतानाही आणि पुरेशी यंत्रणा कामी लावलेली असतानाही भाजपला पश्चिम बंगालच्या निवडणुकीत लक्षणीय यश मिळवता आले नाही.
बंगालमध्ये ममतांनी तिसऱ्यांदा तेथे सत्ता स्थापन केली. त्यामुळे भाजपच्या प्रतिमेवरही त्याचा विपरीत परिणाम झाला असून त्याचा फटका उत्तरप्रदेशातील निवडणुकीतही बसू शकतो अशी चिंता भाजपच्या गोटात व्यक्त केली जात आहे.
या बैठकीला जे.पी. नढ्ढा, संघाचे महत्त्वाचे नेते दत्तात्रय होसबाळे, उत्तरप्रदेशचे संघटन प्रमुख सुनिल बन्सल, आदि उपस्थित होते. या बैठकीला उपस्थित असलेले उच्चपदस्थ लक्षात घेता भाजपच्या कोअर गटातच सध्या कमालीची अस्वस्थता पसरली असल्याचेच हे लक्षण मानले जात आहे.
करोनाच्या सध्याच्या लाटेत देशात मोठे नुकसान झाले आहे. रूग्णांलयांमधील अपुरी व्यवस्था, लोकांना ऑक्सिजन आणि आयसीयु बेडसाठी तसेच औषधांसाठी करावी लागलेली वणवण यामुळे थेट पंतप्रधान मोदींवर मोठी टीका सुरू आहे. त्याची दखलही या बैठकीत घेण्यात आली.
उत्तरप्रदेशात गंगा नदीत असंख्य प्रेते वाहात आली आहेत त्यामुळे त्याचा मोठा फटका उत्तरप्रदेश सरकारबरोबरच केंद्रातील मोदी सरकारलाही बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लोकांनी त्या अनुषंगाने सडकून टीका केली आहे त्याविषयीही यावेळी चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. उच्चपदस्थांना सर्वाधिक चिंता उत्तरप्रदेशच्या निवडणुकीची लागली आहे.