नवी दिल्ली – जोपर्यंत लखीमपूर हिंसेला जबाबदार असलेल्या मंत्र्याची हकालपट्टी होत नाही, जोपर्यंत त्या मुलाला अटक केली जात नाही, तोपर्यंत मी लढतच राहणार. मी तसूभरही मागे हटणार नाही. मी पीडितांच्या कुटुंबांना तसे वचनच दिले आहे, असे कॉंग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.
प्रियंका गांधी यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी थेट योगी सरकारला इशारा दिला आहे. मी लढणारच. जोपर्यंत या मंत्र्याची हकालपट्टी होत नाही, जोपर्यंत या मुलाला अटक केली जात नाही. तोपर्यंत मी हटणार नाही. कारण मी त्या कुटुंबाला वचन दिले आहे. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी झाली पाहिजे. नैतिकतेच्या आधारे मंत्र्याने राजीनामा दिलाच पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
लखीमपूर हिंसेतील पीडितांना नुकसानभरपाई देण्याची घोषणा सरकारने केली आहे. घोषणा केली म्हणजे सर्व काही संपत नाही. पीडित कुटुंबीयांना नुकसान भरपाई नव्हे तर न्याय हवा आहे, असे सांगतानाच जोपर्यंत राज्याचा गृहमंत्री राजीनामा देत नाही आणि आरोपींना शिक्षा होत नाही, तोपर्यंत पीडितांना न्याय मिळणार नाही, असे त्या म्हणाल्या.