मुंबई – अंधेरी विधानसभा पोटनिवडणूकीसाठी भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही पक्ष मैदानात उतरले आहे. 3 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर 17 ऑक्टोबर ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या अकाली निधनानंतर अंधेरीची जागा रिक्त झाल्याने या ठिकाणी पोटनिवडणूक होत आहे.
भाजपकडून मुरजी पटेल तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून आमदार कै. रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला. दरम्यान, एखाद्या आमदाराचे अकाली निधन झाले आणि त्याठिकाणी त्यांच्या घरातील कोणी पोटनिवडणुकीसाठी उभा असल्यास ही निवडणूक बिनविरोध केली जाते अशी महाराष्ट्राच्या राजकारणाची संस्कृती आहे, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ही निवडणूक भाजपने लढवू नये, असे आवाहन केले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्र लिहून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवडणूक न लढवण्याची विनंती केली. त्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत भाजपने पोटनिवडणूक न लढवण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतर शिवसेना प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका पोस्टद्वारे शरद पवार यांचे आभार मानले आहेत. मात्र त्या पोस्टमध्ये राज ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंची पोस्ट ट्विट करत कॅप्शन दिले आहे. राजसाहेब एक म्हण आठवली “कपटी भावापेक्षा दिलदार शत्रू बरा” असे लिहिले आहे. या पोस्टची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
राजसाहेब एक म्हण आठवली “कपटी भावा पेक्षा दिलदार शत्रू बरा” pic.twitter.com/S9VHNEl4ja
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) October 16, 2022