केंदुर – गेल्या आठवड्यात केंदूर भागासह संपुर्ण शिरूर तालुक्यात जोरदार पाऊस झाला. ओढे-नाले, बंधारे, रस्ते फुटून वाहून गेले, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या सर्व परिस्थितीचे वृत्त प्रभातने प्रसारीत केल्यानंतर झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज केंदूर, करंदी, पाबळ परिसरात उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख यांनी पाहणी दौरा केला.
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देत नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पंचनामा केला जाईल. त्याचबरोबर हा संपूर्ण अहवाल शासनाकडे पाठवला जाईल आणि शासनान देणार असलेली मदत प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवली जाईल. यातून एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची आम्ही खबरदारी घेणार आहोत, असे मत यावेळी उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी व्यक्त केले.
करंदी आणि केंदूर परिसरामध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे करंदीच्या उत्तर भागात असलेल्या चार पैकी तीन नाले फुटून शेतकर्यांच्या शेतात पाणी गेले आहे. त्याचबरोबर वेळ नदीला पुर आल्याने बंधारा फुटला आणि बंधाऱ्याचे दरवाजे वाहून गेले आहे. पऱ्हाडवाडी आणि केंदुरच्या इतर भागात देखील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीची देशमुख यांनी पाहणी केली.
यावेळी त्यांनी झालेल्या नुकसानीचा संपूर्ण आढावा घेतला. शेतकऱ्यांशी संवाद साधला त्याचबरोबर ज्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्या सर्व शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामा करण्याच्या सूचना स्थानिक तलाठी व कृषी अधिकारी यांना दिल्या.
या दौऱ्यामध्ये त्यांच्यासमवेत पंचायत समितीच्या उपसभापती सविता पऱ्हाड, विठ्ठल पऱ्हाड, सुरेश उंद्रे, काळूराम दरेकर, मदन पऱ्हाड, सतीश पऱ्हाड, संतोष ढोकले, प्रवीण झेंडे, बाप्पू दरेकर, संजय पऱ्हाड आदी शेतकरी उपस्थित होते.