राजगड (प्रतिनिधी) – तालुक्यातील वेल्हे येथील शेतकरी शिवाजी देवगिरकर व पत्नी जयश्री यांनी अर्धा गुंठे क्षेत्रावर पंचवीस मोगरा वेलांची लागवड करून त्यातून सुरुवातीच्या हंगामात आतापर्यंत ४० दिवसांमध्ये ४५ हजार रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. अजून फुले व कळी तोड चालू आहे. हा हंगाम तीन महिने चालतो. अजून महिनाभर अशीच तोड चालू राहिली तर उत्पन्नात दुपटीने वाढ होऊ शकते व खर्च वजा जाता यातून ६० हजार रुपये निव्वळ नफा होणार असल्याचे देवगिरीकर यांनी सांगितले.
अर्धा एकर क्षेत्रामध्ये दोन गुंठे क्षेत्रात घर उर्वरित क्षेत्राला चेन जाळी कुंपण त्यामध्ये काही झाडे आंबे, चिक्कू, पेरू, मोसंबी, मसाल्याची झाडे, सोनचाफा, कागदी लिंबू, मिश्र भाजी पिके आणि मोगरा लागवड करण्यात आली आहेत. मोगरा फुले व कळी तोडणीसाठी पत्नी जयश्री देवगिरीकर, मुलगी व नातेवाईक अंजली भुरुक असे सर्वजण मिळून आम्ही शेतीत नवनवीन प्रयोग करतो, असे शिवाजी देवगिरीकर यांनी सांगितले.
२००८ साली या सर्व झाडांची लागवड व कुंपण केलेले आहे. त्या वेळेस साधारण दोन लाख रुपये खर्च आला. बोअरवेल दोनशे फूट खोलीपर्यंत आहे. त्याचे पाणी बारा महिने चोवीस तास पुरते. वेळ प्रसंगी आजूबाजूच्या लोकांनाही पाणी पुरवठा करतो, असेही देवगिरीकर यांनी सांगितले.
शिवाजी देवगिरकर व त्यांच्या पत्नी जयश्री देवगिरकर या नेहमी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करतानाच मागणीनुसार ग्राहकांपर्यंत भाजीपाला पोहचविण्याची सुद्धा व्यवस्था करतात. तर अनेक ग्राहक हे राजगड तालुक्यात पर्यटनाला आल्यावर स्वतःहून त्यांच्या शेतात जाऊन भाजीपाला खरेदी करतात.
रोज अर्धा ते एक किलो मोगरा फुले सापडतात. त्यापासून पन्नास ते साठ गजरे तयार होतात. एक गजरा २५ ते ३० रुपयेप्रमाणे विकला जातो. त्यापासून ९०० ते ११०० रुपये रोज मिळतात. मार्च, एप्रिल व मे असे तीन महिने रोज फुले सापडतात.
या वेलांची कुठल्याही प्रकारची काळजी घ्यावी लागत नाही. पण जानेवारीपासून आठवड्यातून एकदा पाणी द्यावे लागते व जूनच्या पहिल्या आठवड्यात प्रत्येक झाडाला एक घमेले शेणखत दिले जाते. बाकी काही करावे लागत नाही. माझी मुलगी वैष्णवी दररोज गजरे व वेणी बनवते, असे देवगिरीकर म्हणाले.
मला शेतीची खूप आवड आहे. मी स्वतः वेगवेगळ्या पिकांची लागवड करते व त्यापासून उत्पन्न पण चांगल्या प्रकारे घेते. माझे पती शिवाजी देवगिरीकर हे सर्व प्रकारे शेतीत मदत करतात. अनेक प्रकारच्या पिकांमधून चांगल्या प्रकारे आर्थिक उत्पन्न मिळते. आमचे बारा ही महिने वेगवेगळे प्रयोग चालू असतात. एकतरी नगदी पीक आम्ही घेत असतो आणि त्याचे नियोजन करतो. माझी भावजई अंजली माझी मुले मला मोलाची मदत करतात. त्या मुळे किरकोळ कामाला मजूर लागत नाहीत. – जयश्री देवगिरकर,
कोट : २००८ साली तीन फूट अंतरावर कळी मोगरा व हजारी मोगरा, अशी दोन जातीची लागवड केली. कळी मोगरा हा उत्पन्नाला उत्कृष्ट असून गजरे बनवण्यासाठी सुटसुटीत फुले आहेत व कळी मोगऱ्र्यापासून बनवलेले गजरे पूर्ण दिवस जसेच्या तसे राहतात.
लागवडीनंतर दुसऱ्या वर्षी उत्पन्न चालू होते व हजारी मोगरा ह्याचे फुल झुपकेदार असते व त्याचा गजरा भरगच्च बनतो. दोन्ही मोगऱ्र्याचां सुगंध खुप दरवळतो. ह्या दोन्ही जाती गावरान आहेत. – शिवाजी देवगिरीकर, शेतकरी
कोट : शेती जास्त किंवा कमी याही पेक्षा शेतीत नवनवीन प्रयोग करणे अत्यंत गरजेचे आहे. जो माल खपतो तोच पिकवला पाहिजे तर आणि तरच शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळू शकतो आणि याचे आदर्श उदाहरण म्हणजे वेल्हे गावचे शिवाजी देवगिरीकर व त्यांच्या पत्नी जयश्री देवगिरीकर या आहेत. त्यांचा आदर्श सर्व शेतकरी कुटुंबातील युवक युवती यांनी घेतला पाहिजे. – जयवंत वाजगे, प्रगतिशील शेतकरी, जुन्नर