कानपूर – इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) लोकांच्या जीवापेक्षा महत्वाची नाही. देशात काय परिस्थिती आहे, त्याचे गांभीर्य काय ते समजुन घेतले पाहिजे, केवळ स्पर्धेचा अट्टहास केला जाऊ नये, असे स्पष्ट मत क्रिकेटपटू सुरेश रैना याने व्यक्त केले आहे.
चीनसह जगभरात पसरलेल्या करोना विषाणूंमुळे देशविदेशातील अनेक स्पर्धा एकतर रद्द करण्यात आल्या आहेत तर, ऑलिम्पिकसह काही स्पर्धा पुढे ढकलल्या गेल्या आहेत. 29 मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धा 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलली गेली आहे. मात्र, करोनाचा वाढता धेका लक्षात घेता त्यावेळीही स्पर्धा होऊ शकेल असे चित्र सध्यातरी दिसत नाही. देशातील लोकांच्या आरोग्याला इतका मोठा धोका उत्पन्न झालेला असताना आयपीएलचा विचार तरी कसा केला जातो याचेच मला आश्चर्य वाटते, अशा शब्दात रैनाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
लोकांच्या जीवाला महत्व द्यायला पाहिजे, आयपीएल काय पुढील वर्षी देखील घेता येईल. काहीही करुन स्पर्धा खेळविणे व लोकांच्या जीवाशी खेळ करणे एक नागरिक म्हणुन मला कधीच मान्य होणार नाही. जर अशा वातावरणात धोका पत्करुनही ही स्पर्धा खेळविण्याचा अट्टहास केला तर त्याचे अत्यंत भीषण परिणाम पुढे भोगायला लागतील, असेही रैनाने स्पष्ट केले.
लॉकडाऊनमुळे रैना देखील घरीच आहे. त्याच्या पत्नीने नुकताच एका मुलाला जन्म दिला. रैना म्हणतो की, सध्या माझा सगळा वेळ माझ्या मुलाबरोबरच व्यतीत होतो. घरात करण्यासारखे खूप काम असते हे मला या काळात लक्षात आले. त्यामुळे मी देखील घरकामात मदत करत आहे. तसेच या निमित्ताने मला माझ्या परिवाराला वेळ देता येत आहे याचेच सर्वात जास्त समाधान आहे, असेही रैनाने सांगितले.