मुंबई – न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात होत असलेल्या टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी मंगळवारी बीसीसीआयने 16 खेळाडूंच्या भारतीय संघाची घोषणा केली. टी-20 संघाचे कर्णधारपद सोडलेल्या विराट कोहलीला या मालिकेतून विश्रांती देण्यात आली असून हहिटमॅन रोहित शर्माकडे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. लोकेश राहुल संघाचा उपकर्णधार असेल.
संघातून वरुण चक्रवर्ती व हार्दिक पंड्या यांना वगळण्यात आले असून महंमद शमी, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा यांनाही विश्रांती देण्यात आली आहे. आयपीएल स्टार महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडने संघात पुनरागमन केले आहे.
तसेच यंदाच्या आयपीएल स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केलेल्या हर्षल पटेल व व्यंकटेश अय्यर यांना संघात स्थान देण्यात आले आहे. यजुवेंद्र चहल व महंमद सिराज यांनी संघात पुनरागमन केले आहे.
तसेच विश्वकरंडक स्पर्धेसाठी निवडलेल्या संघात राखिव असलेल्या श्रेयस अय्यर, अक्सर पटेल व दीपक चहर यांना मुख्य संघात या मालिकेसाठी स्थान देण्यात आले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेला येत्या 17 नोव्हेंबरला जयपूर येथील पहिल्या सामन्याने प्रारंभ होणार आहे. दुसरा सामना 19 नोव्हेंबरला रांचीत तर, तिसरा सामना 21 नोव्हेंबरला कोलकाता येथे होणार आहे.
भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (अतिरीक्त यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, यजुवेंद्र चहल, रवीचंद्रन अश्विन, अक्सर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल व महंमद सिराज.