जादा वाहतुकीमुळे ताणही वाढला; उपाययोजनांची गरज
कराड – जुना कृष्णा पूल पडल्याने तेथील वाहतूक नवीन पुलावरून वळविण्यात आली आहे. त्यामुळे त्या पुलावर वाहतुकीचा मोठा ताण निर्माण झाला आहे. मात्र या कृष्णा पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पुलावर सुरक्षेच्या उपाययोजनाच करण्यात आलेल्या नाहीत. या सर्वांचा त्रास म्हणून अगोदरच वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मात्र पुलावरील खड्डयांचाही नाहक त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. बांधकाम विभागाने याकडे वेळीच लक्ष देऊन नवीन कृष्णा पुलावरील आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधा पुरवणे गरजेचे आहे. अन्यथा या पुलावरून छोटे-मोठे अपघात होण्याची शक्यता आहे.
गुहागर-पंढरपूर या वर्दळीच्या राज्य मार्गावरील शहराजवळचा ब्रिटीशकालीन पुलाचा काही भाग काही दिवसांपूर्वी पाण्याबरोबरच वाहून गेला. तत्पुर्वीच प्रांताधिकारी हिम्मत खराडे व पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांनी तो पूल वाहतुकीस बंद केला होता. त्यामुळे त्या पुलावरील वाहतूक नवीन कृष्णा पुलावरुन वळवण्यात आली आहे. त्यामुळे त्या पुलावरील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सैदापूर-विद्यानगर भागात सर्व प्रकारची कॉलेज, क्लासेस असल्याने आणि तो राज्यमार्ग असल्याने अगोदरच त्या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यात भरीस भर म्हणून तासवडे येथील टोलनाका चुकवण्यासाठी बरीच अवजड वाहने मसूरमार्गे या पुलावरून पुढे मार्गस्थ होतात. यामुळे कृष्णा नाक्यावरील सिग्नल पासूनच वाहतूक जाम होत असून ती पुलावरुन कृष्णा कॅनालपर्यंत जाम होत आहे. त्यातच पावसाने पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.
ते खड्डे चुकवण्याच्या नादात छोटे-मोठे अपघाताचे सत्र सुरूच आहे. पालिकेने ते खड्डे न भरल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कृष्णा कॅनालकडून कराडकडे येणाऱ्या बाजूच्या उताराला तर मोठा खड्डा पडला आहे. त्यामध्ये मोठी वाहने आदळत असून दुचाकी त्या खड्ड्यात जावून अपघात होत आहेत. हे सर्व होत असताना बांधकाम विभाग मात्र मूग गिळून गप्प आहे. त्यांच्याकडून त्यावर काहीच उपाययोजना हाती घेतलेल्या नाहीत. परिणामी खड्डयांचा नाहक त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. बांधकाम विभागाने एखादा मोठा अपघात होऊन दुर्दैवी घटना घडण्याअगोदर पुलावरील गैरसोय तातडीने दूर करणे गरजेचे असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.
नवीन कृष्णा पुलावरील वाहतुकीचा ताण फारच वाढला असून साधारणतः सकाळी दहा ते बारा यावेळेत विद्यानगरीत महाविद्यालय सुरू होण्याच्या वेळेस येथील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होवू लागली आहे. त्यामुळे कृष्णा कॅनॉल ते सगाम कॉलेजपर्यंत तर कराड बाजूला कृष्णा नाक्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. यासाठी या परिसरात कायमस्वरूपी वाहतूक पोलीस नेमण्याची गरज आहे. मात्र कधी-कधी हे पोलीस याठिकाणी दिसत नाहीत.
गुहागर-पंढरपूर या मार्गावरील कराड-ओगलेवाडीला जोडणाऱ्या नवीन कृष्णा पुलावरुन दुहेरी वाहतूक सुरू असल्याने ट्राफीक जामचा वाहनधारकांना सामना करावा लागत आहे. त्यामुळे पुलाच्या मधोमध बॅरीगेटची गरज आहे. त्याचबरोबर सुरक्षेसाठी पुलाच्या उतारालाही संरक्षक लोखंडी पाइप बसवण्याची गरज आहे. तसेच या पुलावर लाइटची सोय नसल्याने रात्रीच्यावेळी याचा फटका वाहनधारकांना बसत आहे. त्यातच हा पूल रुंदीने कमी असल्याने रात्रीच्यावेळी देखील लहान-मोठे अपघात घडत आहेत. त्यामुळे पुलावर लाइटची व्यवस्था करावी, अशी अपेक्षा वाहनधारकांकडून व्यक्त केली जात आहे.