नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मनोरमा न्यूज कॉन्क्लेव्हचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कार्यक्रमात नव्या भारताची संकल्पना विस्तृतपणे मांडत नव्या भारतामध्ये तरुणांच्या आडनावाला फारसे महत्त्व राहणार नाही. त्यापेक्षा त्यांच्या कर्तृत्त्वाला महत्त्व येईल, असे सांगितले.
त्याचबरोबर आम्ही घडवत असलेल्या नव्या भारतामध्ये निवडक लोकांचे ऐकण्याला महत्त्व नसेल, तर प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेतले जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. काही वर्षांपूर्वीपर्यंत देशात दोषपूर्ण संस्कृतीला उत्तेजन देण्यात येत होते. त्या संस्कृतीमध्ये महत्त्वाकांक्षा शब्दांकडे कुत्सितपणे बघितले जात होते. मात्र, आता तसे घडणार नाही. केवळ आडनाव आणि संपर्काच्या आधारावर कोणालाही संधी मिळणार नाही. तरुणांना त्याचे कर्तृत्त्व दाखवावे लागेल, असे त्यांनी सांगितले.
मोदींनी पुढे म्हटलं की, आम्हाला प्रत्येक गोष्टीवर सहमत असण्याची गरज नाही, सार्वजनिक जीवनात इतकी सभ्यता असावी की भिन्न विचारसरणीचे लोक एकमेकांचं ऐकू शकतील. मोदींनी देशवासियांना संबोधित करताना म्हटले की, हा नवीन भारत देश आहे, येथे भ्रष्टाचाराला थारा नाही. विचार वेगवेगळे असले तरी लोकांमध्ये आणि वेगवेगळ्या संघटनांमध्ये संवाद व्हायला हवा. वेगवेगळ्या विचारांवर श्रद्धा असणाऱ्या लोकांनी दुसऱ्यांचे विचारही गंभीरपणे ऐकायला पाहिजेत. तेवढी सभ्यता सार्वजनिक जीवनात असली पाहिजे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. आता सामान्य लोकांनी रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधांचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. कोणीही असा विचार केला होता की, हे कधी शक्य होईल? व्यवस्था देखील एकसारखी आहे आणि लोक देखील समान आहेत. केवळ कार्य करण्याच्या पद्धतीमध्ये फरक आहे.