नवी दिल्ली: राष्ट्रवादी कॉंग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) आणि तृणमूल कॉंग्रेस या राजकीय पक्षांचा राष्ट्रीय दर्जा धोक्यात आला आहे. त्यासंदर्भात निवडणूक आयोग 9 सप्टेंबरला त्या पक्षांची बाजू ऐकणार आहे.
लोकसभा निवडणुकीत पीछेहाट झाल्याने त्या पक्षांना निवडणूक आयोगाने याआधीच नोटिसा बजावल्या. आपला राष्ट्रीय पक्ष हा दर्जा रद्द का करण्यात येऊ नये, अशी विचारणा त्याद्वारे करण्यात आली. त्यावर संबंधित पक्षांनी निवडणूक आयोगाला उत्तर पाठवून राष्ट्रीय दर्जा अबाधित राहण्याचे समर्थन केले. आता आयोग त्या पक्षांची बाजू ऐकून घेणार आहे. सध्या राष्ट्रीय दर्जा असलेले आठ राजकीय पक्ष आहेत. त्यामध्ये भाजप, कॉंग्रेस, बसप, माकप आणि मेघायलच्या नॅशनल पीपल्स पार्टीचा समावेश आहे.