ईडीचा हायकोर्टात दावा
मुंबई: कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून फरार झालेले मेहुल चोक्सीसारखे आरोपी कायद्याच्या तावडीतून सुटू शकणार नाहीत. त्यासाठी कायद्यात विशेष तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती अंमलबजावणी संचालनालयाने मुंबई उच्च न्यायालयात दिली.
मेहुल चोक्सी याची अंमलबजावणी संचालनालयाने सुमारे 1869 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. याशिवाय महागडे पेंटिंग्ज, गाड्या, शोपीस ताब्यात घेतले आहे. ईडीने चुकीच्या पध्दतीने हे मौल्यवान साहित्य जप्त केले असून ही कारवाई थांबवावी यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती इंद्रजित महंती आणि न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.
यावेळी न्यायमूर्तींनी मेहुल चोक्सी जर उद्या मुख्य खटल्यातून सुटला तर त्याच्या विरोधात ईडीने केलेली कारवाई व्यर्थ जाईल. त्यामुळे या आरोपींविरोधात कोणतीही कारवाई करताना कायदेशीर बाबी नीट तपासून घ्या, असे ईडीला बजावले. ईडीच्या वतीने ऍड. हितेन वेणेगावकर यांनी बाजू मांडताना न्यायालयात सांगितले की चोक्सी आणि त्याच्यासारखे इतर आरोपी कायद्याच्या तावडीतून सुटूच शकणार नाहीत. त्यासाठी एफईओ या नव्या कायद्यात तशी तरतूद करण्यात आली आहे. खंडपीठाने हा युक्तिवाद ऐकून घेत सुनावणी तहकूब केली.