मुंबई – इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) करोना असो वा आणखी काही कोणत्याही परिस्थितीत खेळविण्याचा अट्टहास भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (आयपीएल) आणि सहभागी संघांचे मालक यांनी सुरुच ठेवला आहे. स्पर्धेतील सामन्यांची संख्या कमी करा, केवळ भारतीय खेळाडूच खेळवा तसेच एका दिवसात दोन सामने खेळवा अशी हट्टी भूमिका घेत स्पर्धेशी जोडले गेलेल्या सगळ्यांनी स्पर्धेचे आयोजन करण्याचा अट्टहास काही सोडलेला दिसत नाही.
करोनाचा प्रसार वाढत असल्याचे दिसून आल्याने 29 मार्चपासुन सुरु होणारी ही स्पर्धा 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलली होती. मात्र, आता आणखी काही काळ तरी ही स्पर्धा स्थगित करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाल्याने मंडळ आणि संघमालक नुकसानाच्या भीतीने वेडेपिसे झाले आहेत. एप्रिलचा अखेरचा अठवडा आणि पूर्ण मे महिना अशा 37 दिवसांत सामने कमी करुन तसेच एका दिवशी दोन सामने तसेच 2 किंवा 3 मैदानेच आरक्षित करुन ही स्पर्धा खेळविता येऊ शकते व त्याला आमची तयारी आहे, असे संघ मालकांनी मंडळाला कळविले आहे.
दुसरीकडे एकवेळ संघ मालकांनी दिलेला प्रस्ताव मान्य करुन या स्पर्धेतून मिळणारा प्रचंड पैसा मंडळाला देखील पाहिजेच आहे. गेल्या काही दिवसांमध्ये व्यक्त होत असलेली मते पाहता संघ मालकांच्या या प्रस्तावाला नकार देण्याची शक्यता नाही. त्याचबरोबर कालावधीचा व वेळापत्रकाचा विचार केला तर ही स्पर्धा एप्रिल अखेर ते मे या कालावधीत न घेता ऑगस्टचे काही दिवस आणि पूर्ण सप्टेंबर महिना या कालावधीत घेण्याबाबत प्रयत्न सुरु झाले आहेत. एकतर ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्वकरंडक स्पर्धा तेथिल सहा महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे पुढे ढकलली गेली तर आयपीएल स्पर्धा घेता येणार आहे. कारण त्यावेळी जागतिक क्रिकेटमध्ये कोणत्याही संघाच्या मालिका नाहीत.
भारत सरकारने परदेशी व्यक्तींचे व्हिसा रद्द केले आहेत. त्यामुळे ही स्पर्धा एप्रिल व मे महिन्यात घेतली गेली तर त्यात परदेशी खेळाडूंचा सहभाग अनिश्चित राहणार आहे. त्यामुळे जर याच काळात ही स्पर्धा खेळवायची असेल तर ती केवळ भारतीय खेळाडूंमध्येच होईल. अर्थात या निर्णयालाही संघ मालकांचे समर्थन आहे. पूर्ण स्पर्धाच रद्द होण्यापेक्षा हा पर्याय स्वीकारणे अव्यवहार्य नाही. फक्त भारतीय खेळाडूंचा विचार करण्याबरोबरच बीसीसीआयला कमीत कमी दिवसात ही स्पर्धा कशी भरवायची, याचाही विचार करावा लागेल.
विविध संघ मालकांनी या स्पर्धेत आपल्या संघात बलाढ्य खेळाडू घेताना त्यांना लिलावात अमाप रकमेचे करार दिले आहेत. परदेशी खेळाडू खेळले नाहीत तर तसाही त्यांचा पैसा वाचणार आहे. त्यातून प्रायोजकांकडून, प्रक्षेपण हक्कांमधून आणि रॉयल्टी म्हणून मिळणारा पैसा सोडण्याची तयारी मंडळ दाखविणार नाही.
रिकामी मैदानेही चालतील
करोनाचा धोका पुढील काळात संपूष्टात आला तरीही लोकांच्या आरोग्याला महत्व देताना सामने रिकाम्या मैदानांवरही खेळविण्याची तयारी पुर्वीच मंडळ आणि संघ मालकांनी दाखविलेली आहे. आता त्याला सामाजीक भान असे स्वरुप देऊन आम्हाला लोकांची कीती काळजी आहे हे देखील दाखविता येणार आहे. रिकामी मैदाने असली तरीही सामन्यांचे थेट प्रक्षेपण होणार असल्याने उलट लोक घरातच थांबतील व सामने पाहतील, त्यामुळे रस्त्यांवर माणसे दिसणार नाहीत व त्याद्वारे करोनापासून बचावही होईल असाही युक्तीवाद सध्या सुरु आहे.