बारामती : विद्यार्थ्यांच्या मनात वैज्ञानिक कुतुहल निर्माण करून सक्षम वैज्ञानिक घडविण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात सायन्स अँन्ड इनोव्हेशन अॅक्टिविटी सेंटर उभारणे गरजेचे असल्याचे मत आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले.
बारामतीतील ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे कृषी विज्ञान केंद्राच्या आवारात राजीव गांधी सायन्स टेक्नॉलॉजी कमिशन, महाराष्ट्र सरकार आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सायन्स अँन्ड इनोव्हेशन अॅक्टिविटी सेंटर उभारण्यात आले आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली व आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांच्या उपस्थितीत या सेंटरचा उद्घाटन सोहळा पार पडला.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना काकोडकर म्हणाले,”राज्यात वारणानगर, प्रवारानगर, सातारा ,अमरावती ,कोकण तसेच बारामतीत अशा प्रकारचे सायन्स अँन्ड इनोव्हेशन अॅक्टिविटी सेंटर निर्माण करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टीकोन वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सायन्स अँन्ड इनोव्हेशन अॅक्टिविटी सेंटर व्हावे.
शाळा महाविद्यालयातील शिक्षणाला वैज्ञानिक शिक्षणाची जोड देणे गरजेचे आहे. सध्याच्या युगात नोकऱ्यांचा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. नोकऱ्या उपलब्ध होणे अशक्य आहे. जिल्ह्यात सायन्स अँन्ड इनोव्हेशन अॅक्टिविटी सेंटर निर्माण झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा सहभाग वाढेल. स्वतःच्या बळावर संशोधन करणारे सक्षम वैज्ञानिक घडतील. व देशाचे नाव जगात उंच करतील.
सक्षम वैज्ञानिक घडवण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात सायन्स अँन्ड इनोव्हेशन अॅक्टिविटी सेंटर ची निर्मिती करणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. राज्य सरकारच्या वतीने सध्या कार्यरत असलेल्या सहा केंद्रांना निधी दिला जात आहे. प्रत्येक जिल्ह्यात अशा प्रकारचे केंद्र सुरू करण्यासाठी आगामी अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली जाईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले.