औरंगाबाद : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी स्वतंत्र पक्ष स्थापना करावा असा प्रस्ताव खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे. विधानपरिषद उमेदवारीवरून त्या चर्चेत आल्या होत्या. शिवाय नुकत्याच झालेल्या भाजपच्या एका कार्यक्रमात देखील रावसाहेब दानवे, खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. मात्र यावेळी देखील पंकजा मुंडे उपस्थित नव्हत्या त्यामुळे पक्षाअंतर्गत गटबाजी असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. शिवाय आता खासदार जलील यांच्या प्रस्तावामुळे पुढे काय होईल याची उत्सुकता आहे.
पंकजा मुंडे यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करावा
खासदार जलील यांनी एका टीव्ही माध्यमाशी बोलताना सांगितले की, पक्षाकडून वारंवार हेटाळणी सहन करण्यापेक्षा पंकजा मुंडे यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करावा, असा प्रस्ताव मी दोन वेळेला दिला आहे. आतादेखील पंकजा भगिनींकडे मी यासंदर्भाने बोललो आहे. एवढंच नाही तर गरज पडल्यास एमआयएम पक्ष तुमच्या पाठीशी उभा राहिल. तुम्हाला मदत करेल, असं आश्वासनही खा. जलील यांनी दिले आहे.
विधानपरिषदेची उमेदवारी नाकारली
भाजप पक्षाकडून पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी नाकारल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. मराठवाड्यातील एक प्रभावी व्यक्तिमत्व , ओबीसी नेत्या म्हणून पंकजा यांच्याकडे पहिले जाते. त्यांच्यासोबाबत एक मोठा जनाधार आहे. असे असतानाही त्यांना पक्षाकडून डावलल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.