बुलढाणा – केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध विकासकामे राबविताना शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याची आवश्यकता आहे. त्यांनी उत्पादित केलेल्या पिकांना भाव मिळावा, त्यातून उद्योग निर्माण व्हावे, तरुणांना रोजगार मिळावा, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
खामगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर शेळद ते नांदुरा या रस्त्याच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, आमदार प्रवीण पोटे, वसंत खंडेलवाल, आकाश फुंडकर, राजेश एकडे, प्रकाश भारसाकडे व चैनसुख संचेती उपस्थित होते.
नितीन गडकरी म्हणाले, मुबलक पाणी उपलब्ध असलेल्या भागाचे भविष्य उज्वल असते. ज्यांच्याकडे पाणीसाठा नाही, ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्यातील पाणीसाठ्यासाठी जिगाव प्रकल्पाला 5 हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहे. यातून जिल्ह्याचे सिंचन क्षेत्र 50 टक्क्यांहून अधिक वाढविण्यात येणार आहे. त्यासोबतच पाण्याचा खारेपणा कमी करण्यासाठी खारपाणपट्ट्यात 900 प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
हा प्रकल्प ऑगस्ट महिन्यापर्यंत पूर्ण करण्यात येईल. तसेच खारपाणपट्ट्यात झिंगा उत्पादनाला वाव असल्याने यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात येईल. शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी पाण्याचा अभावासह अधिक खर्चात असलेली शेती ही कारणे असल्याने याबाबतही उपाययोजना गरजेच्या आहेत. शेतीचा शाश्वत विकास करताना तलाव, नदी, नाल्यांचे खोलीकरण करण्यासोबत वाहत्या पाण्याला थांबविणे आणि थांबलेले पाणी जमिनीत मुरवण्यासाठी प्रयत्न झाल्यास पाण्याची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.