एकदा एक राजपुत्र शिकारीसाठी वनात गेला. तिथे त्याने एक सुंदर हरीण पाहिले. राजपुत्राने आपले धनुष्यबाण सज्ज केले. तो त्या हरणाच्या मागे धावत सुटला. पाहता पाहता त्या हरणाने राजपुत्रास गुंगारा दिला आणि ते आपले प्राण वाचविण्यासाठी वाट दिसेल तिकडे धावत सुटले, तोच त्या हरणास एका वृक्षाखाली बसलेला एक तपस्वी दिसला. ते हरीण त्या तपस्वीच्या जवळ जाऊन उभे राहिले.
आता राजपुत्र बाण सोडणार आणि त्यास मारणार तोच तो तपस्वी डोळे उघडून त्या राजपुत्राकडे पाहात म्हणाला, “थांब, राजपुत्रा थांब. या निष्पाप जीवाची हत्या करू नकोस. हे बघ, तुला जर शिकारच करायची असेल तर तू आणि तुझ्याच मनाची शिकार कर, आम्ही करतो तशी.’
त्या तपस्वीचे बोलणे ऐकले आणि तो राजपुत्र पुरताच विचारात पडला. कारण थांब, त्याची शिकार करू नकोस. हिंसा करू नकोस हे सांगणे ठीक; पण शिकार करायची तर ती मनाची शिकार कर म्हणजे काय? दुसरी गोष्ट अशी की, हा तपस्वी म्हणतो की आम्ही करतो तशी, म्हणजे नेमके काय? तो चांगलाच गोंधळला. तेव्हा त्यास समजावीत तो तपस्वी म्हणाला, “हे बघ, शिकार करायची, मजा लुटायची, एक जीव मारायचा, त्याचं रक्त, मांस भक्षण करायचं ही इच्छा की कामना, तुझ्या मनात कुठून आली.
हिंसेचा विचार हा माणसाच्या मनात पहिल्यांदा जागा होतो. तो बळावतो आणि मगच तो त्याच्या कृतीत उतरतो. जर आपल्याला कोणास जिवंत करता येणार नसेल, तर त्याला मारण्याचा तरी आपल्याला काय अधिकार आहे? हिंसा ही वाईट आहे. ते एक पाप कर्म आहे. ते पाप कर्म ही आपल्याच मनातली वासना, कल्पना, हाव, अपेक्षा यातूनच आपल्या हातून घडत असते. म्हणूनच त्या जिथे उपन्न होतात त्या मनाचीच शिकार करायची असते.
आपणच आपल्या मनातील दुष्ट विचार, कल्पना, द्वेष, मत्सर, अहंकार असूया या सर्व दुष्ट प्रवृतींचा विवेक विचाराच्या बाणांनी संहार करायचा, त्यांना मारून त्यावर विजय मिळवायचा असतो. बा राजपुत्रा! अरे या मनमृगाची शिकार करणे हा विवेक आहे. ते खरं शौर्य आहे. तुला जर शिकारच करायची असेल तर ती तुझ्या देहरूपी जंगलाच्या आत्मघातकी, चपळ, वासनिक मनाची कर. त्यानेच तू खरा सुखी होशील. कारण बाळा, मन जिंकी तो सर्व जिंकी हे विसरू नकोस.’