नावात काय आहे?
पुणे, दि. 25 – कराड आणि सातारा येथे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण आणि परराष्ट्रमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे सत्कार कार्यक्रम पार पडले. त्यावेळी नावातील साधर्म्यामुळे अनेक गमतीदार प्रसंग घडले. अनेक वक्त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात यशवंतराव आमचे प्रिय मुख्यमंत्री व शंकरराव आपले परराष्ट्रमंत्री अशा शब्दांनी केली. एका वक्त्याने गोंधळ टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे संपूर्ण नाव घेतले ते असे- शंकरराव बळवंतराव चव्हाण. पण तेही चुकलेच. कारण बळवंतराव हे यशवंतरावांच्या वडिलांचे नाव आहे, तर शंकररावांच्या वडिलांचे नाव भाऊराव आहे. या गोंधळात सहकारी बॅंकेचे अध्यक्ष शामराव कदम यांचा उल्लेखही शामराव चव्हाण असा केला गेला.
महात्मा फुले यांचे विचार आजही महत्त्वाचे
पुणे – महात्मा फुले यांच्या अर्धपुतळ्याचे आज परराष्ट्रमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी येथील कृषि महाविद्यालयामध्ये अनावरण केले. महाराष्ट्राचे कृषिमंत्री शरद पवार हे समारंभाचे अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी महात्मा फुले यांच्या स्मृतीला आदरांजली अर्पण करताना यशवंतराव चव्हाण म्हणाले की, महात्मा फुले प्रतिभावान विचारवंत होते. मानवतेचे मूलभूत प्रश्न समजावून घेऊन त्याचे विश्लेषण करण्याचा त्यांनी शंभर वर्षांपूर्वी प्रयत्न केला. सामाजिक रचना न्याय आणि समतेवर आधारित असावी असा त्यांचा आग्रह होता. त्यांचे हे विचार आजही महत्त्वाचे आहेत.