नवी दिल्ली – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कृषी विधेयकावर चर्चा करण्यासाठी भेट नाकारल्यामुळे पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी आज दिल्लीतील जंतरमंतरवर धरणे आंदोलन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने पारित केलेल्या तीन कृषी विधेयकाच्या विरोधात देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. पंजाब सरकारने या तिन्ही विधेयकांना निष्प्रभावी करणारा प्रस्ताव पंजाब विधानसभेत पारित केला आहे. मात्र, हे विधेयक राज्यपालांकडे प्रलंबित आहे.
अमरिंदर सिंग म्हणाले, कृषी हा राज्याचा विषय आहे. यामुळे केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना नाकारणारे विधेयक पंजाब विधानसभेत पारित करण्यात आले आहेत. सरकारने 20 ऑक्टोबर रोजी हे विधेयक राज्यपालांकडे पाठविले होते. मात्र, त्यांनी हे विधेयक अद्याप राष्ट्रपती यांच्याकडे पाठविलेले नाही. राष्ट्रपती पंजाबच्या विधेयकांना मंजुरी देतील, अशी आशा सुध्दा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
अमरिंदर सिंग यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली होती. परंतु, त्यांना भेटीची वेळ मिळाली नाही. यामुळे नाईलाजापोटी जंतरमंतरवर धरणे द्यावे लागत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. नवज्योतसिंग सिध्दू या आंदोलनात सामील होणार होते. परंतु, पंजाब-दिल्ली सीमेवरच त्यांना रोखण्यात आले.
दुसरीकडे, भाजप, शिरोमणी अकाली दल आणि आम आदमी पक्षाने अमरिंदर सिंग यांच्या आंदोलनाला फोटो सेशन असल्याचा आरोप केला आहे. शिअदचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांनी सुध्दा मुख्यमंत्र्यावर नाटक करीत असल्याचा आरोप केला आहे. अमरिंदर सिंग यांनी जंतरमंतरऐवजी राजघाटवर आमरण उपोषण करावे, असा टोमणा सुध्दा मारला.