बंद उद्यानांमध्ये फुलझाडे, फुलपाखरू, मधमाशा आणि पक्ष्यांच्या संख्येत वाढ
प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या पर्यावरण विभागाचे निरीक्षण
पिंपरी – कोविडचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता आयुक्त राजेश पाटील यांनी 9 मार्चपासून पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व उद्याने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. यामुळे नागरिकांचा हिरमोड झाला असला तरी हा निर्णय उद्यानांमधील वनस्पती आणि फुलपाखरू, मधमाशा आणि पक्ष्यांच्या पथ्यावर पडला आहे. याचा चांगला परिणाम उद्यानातील फुलझाडांवर झाला आहे. ही फुलझाडे बहरली असून जास्वंद आणि चाफ्याची विविधरंगी फुले मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. फुलपाखरू, मधमाशी आणि कीटकांची संख्याही वाढल्याचे निदर्शनास आले आहे. त्याशिवाय, विविध पक्ष्यांच्या संख्येतही वाढ झाल्याचे निरीक्षण प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या पर्यावरण विभागाने नोंदविले आहे.
समितीच्या पर्यावरण विभाग सदस्यांच्या अभ्यास गटाने प्राधिकरण परिसरातील उद्यानांमध्ये “कोविड काळातील पर्यावरण बदल’ या विषयावर परीक्षण व निरीक्षण केले. 15 ते 25 मार्च दरम्यान केलेल्या या निरीक्षणात महत्वपूर्ण बदल नोंदविले गेले आहेत. विजय मुनोत, विजय जगताप, विशाल शेवाळे, बाबासाहेब घाळी, संदीप सकपाळ, मंगेश घाग, अजय घाडी, नितीन मांडवे, राजेश बाबर, संतोष चव्हाण, अर्चना घाळी, ऍड. विद्या शिंदे, सुनिल चौगुले, अमित डांगे, अमोल कानू, सतीश देशमुख या सदस्यांच्या अभ्यास गटाने हे निरीक्षण केले. एरवी उद्याने नागरिकांच्या गर्दीने भरून गेलेली असतात. यापूर्वी अनेक नागरिक पहाटेच्या सुमारास सार्वजनिक बागेतील फुलझाडांच्या कळ्याच तोडून नेत असत. त्यामुळे गेल्या अनेक वर्षात फुलझाडे कधीही फुललेली नजरेस पडत नव्हती.
मानवी हस्तक्षेप थांबल्याने सकारात्मक परिणाम
समितीच्या वतीने सांगण्यात आले की, आयुक्त राजेश पाटील यांनी शहरात 9 मार्चपासून उद्याने बंद ठेवण्याचे आदेश दिले. त्याचा सकारात्मक परिणाम फुलझाडांवर दिसून आला. पक्षीही उद्यानांमध्ये मुक्त संचार करतांना दिसून आले. वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे फुलझाडांवर विपरीत परिणाम झाल्याने पर्यावरण संतुलनही मधल्या काळात बिघडून गेले होते. करोना काळामध्ये निसर्ग वेगाने स्वतःमध्ये बदल करून घेत असल्याचे दिसून आले आहे.
उद्यानातील निरीक्षणाचे निष्कर्ष काय?
फुलझाडे मोठ्या प्रमाणात बहरली.
जास्वंद आणि चाफ्याच्या विविधरंगी फुलांचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले.
बहाव्याची पिवळी फुले सोनेरी रंगाची मुक्त उधळण करत उद्यानांमध्ये दिसून येत आहे.
फुलपाखरे, मधमाशी आणि कीटकांची संख्याही वाढल्याचे आढळून आले.
उद्यानाच्या मैदानी भागात मुंग्यांची छोटी-छोटी वारुळेही प्रथमच मोठ्या प्रमाणात वाढली.
कोकिळा, पोपट, चिमण्या, बुलबुल, राखाडी धनुष, मैना, साळुंखी, टिटवी, केकाटे, रंगीत चिमण्या,घार या पक्ष्यांच्या संख्येमध्ये वाढ झाली.
उंच खेर आणि कदंब वृक्षावरती प्रथमच घारींची घरटी निदर्शनास आली.
कोकिळेच्या “कुहू-कुहू’ आवाजामध्ये सकाळी 6 ते 9 च्या दरम्यान मोठी वाढ झाली.
खारूताईच्या संख्येतही वाढ नोंदविण्यात आली आहे.