छत्रपती संभाजीनगर – हिंसाचाराच्या घटनांमुळे बीड जिल्ह्यातील काही भागात लागू करण्यात आलेली संचार बंदी प्रशासनाने बुधवारी सकाळी उठवली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील जिल्ह्यात मनाई आदेश सुरू राहतील आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी या भागातील इंटरनेट सेवा अजूनही बंदच ठेवण्यात आल्या आहेत.
धाराशिव जिल्ह्यात सध्या लागू असलेल्या कर्फ्यूमध्ये कोणतीही शिथिलता देण्यात आलेली नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.बीड पोलिसांनी हिंसाचाराच्या संदर्भात 30 हून अधिक गुन्हे दाखल केले आहेत आणि 99 जणांना अटक केली आहे.
बीडमध्ये सोमवारी झालेल्या हिंसाचारानंतर जिल्ह्यातून जाणाऱ्या सर्व राष्ट्रीय महामार्गांसह जिल्हाधिकारी कार्यालय, तालुक्यांची मुख्य कार्यालये यापासून 5 किलोमीटरच्या परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. बीडमध्ये अजूनही इंटरनेट सेवा बंद आहे, असे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी पत्रकारांना सांगितले.
मंगळवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनीही मंगळवारी राष्ट्रीय महामार्ग आणि इतर रस्त्यांवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) संजय सक्सेना यांनी मंगळवारी बीड जिल्ह्याचा दौरा केला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार गट) आमदार प्रकाश सोळंके यांचे बीडमधील माजलगाव शहरातील निवासस्थान सोमवारी सकाळी मराठा आंदोलकांच्या गटाने जाळले आणि दगडफेक केली. त्यानंतर आंदोलकांनी माजलगाव नगरपरिषदेच्या इमारतीचा पहिला मजला पेटवून दिला.
सोमवारी सायंकाळी आंदोलकांच्या आणखी एका गटाने बीड शहरातील राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या निवासी आवारात आणि कार्यालयात घुसून त्यांना आग लावली. महाराष्ट्राचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे शहरातील निवासस्थानही जाळण्यात आले. राष्ट्रवादीचे नेते अमरसिंह पंडित यांच्या घराबाहेर जमलेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.