डिंभे – आंबेगाव तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पाहिली असता आंबेगाव हा खेड्यापाड्यांचा तालुका म्हणून ओळखला जातो. तसेच औद्योगिकीकरणामध्ये शैक्षणिक कारखानदारी उद्योग व्यवसायामध्ये अग्रेसर असणारा पुणे जिल्ह्यातील एकमेव तालुका म्हणून ओळखला जातो. याचबरोबर तालुक्याची राजकीय परिस्थिती पाहाली असता तालुक्यामध्ये जनतेचे लोकप्रतिनिधी दोन्हीही पक्षाचे तुल्यबळ असणारे नेते आहेत. यामुळे या तालुक्याचा बर्यापैकी कायापालट झाला. तालुका विकासाकडे अग्रक्रमण करत असला तरी तालुक्यातील बळीराजा आजही बर्यापैकी कर्जपणामुळे तसेच निसर्गाच्या वाढत्या बदलामुळे मेटाकुटीस आला आहे.
आंबेगाव तालुक्याचा पश्चिम पट्टा हा प्रामुख्याने आदीवासी पट्टा म्हणून ओळखला जातो. यामध्ये प्रामुख्याने सह्यद्रीच्या कुशीत वसणार्या आदिवासी बांधवांचा समावेश होत असला तरी येथील शेती तसेच शेतीपूरक व्यवसाय हे मोठ्या प्रमाणात असल्याने येथील शेतकर्यांना जरी रोजगार मिळाला. तरी सध्याच्या सरकारच्या धोरणातील असणार्या बळीराजावर शेती व व्यवसायासाठी लागणार्या कर्जावरती लावली जाणारा (जीएसटी) जनरल सर्व्हिस टॅक्स व इतर कर यामुळे शेतकीय मालाला बाजार भाव मिळत नसल्याने शेतकर्याला आपला माल कवडीमोल बाजारभावात विकावा लागतो. सध्या शहरी लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू आणणारा कांदा पिकास मोठ्या प्रमाणात मागणी असली तरी आजही आमच्या बळीराजाच्या डोळ्यात हाच कांदा अश्रू आणत आहे.
अवकाळी पाऊस, गारपीट, मजुरांचा तुटवडा यामुळे पुरता बेजार झालेला बळीराजास याही वर्षी भिकेचे डोहाळे लागल्याचे दिसते. शासनाने सध्या परकीय कांदा आयात केल्याने आमच्या शेतकर्याच्या कांद्याला कवडीमोल बाजारभाव मिळत असून बळीराजा हा मेटाकुटीस आला आहे. एकीकडे निसर्गाचा खेळ तर दुसरीकडे शासनाचे शेतकर्यांचे असणारे धोरण या दोन्हीच्या मिलापाने आजचा शेतकरी वर्ग खरोखरच सुखी आहे का?
मागील काही महिन्यांपूर्वी सरकारने जे काही कर्जमाफीची धोरण राबविले यावर किती अर्थाने शेतकर्याला सातबारा कोरा झाला? अजूनही शेतकर्यांच्या आत्महत्या थांबणार का? शेतकर्यांच्या बाजारभावाला हमीभाव मिळेल का? असे विविध प्रश्न हे आंबेगाव तालुक्यातील शेतकर्यांना पडले आहेत. आंबेगाव तालुक्यातील बहुतांशी शेती ही बागायती आहे. यामध्ये ऊस पीक हे प्रामुख्याने घेतले गेले असले तरी तालुक्याच्या विकासात असणार्या कारखानदारीत ऊस उत्पादक शेतकरी नाराज झाले असून, नक्की शेतीमध्ये करावे काय हा प्रश्न त्यांना भेडसावत आहे.
बळीराजा कधी मोकळा श्वास घेणार
दरवर्षी कृषी विभाग व महसुल विभागामार्फत पंचनामे करुन बळीराजाच्या पदरी तुटपुंजी मदत केली जाते. शेतीत झालेल्या खर्चाच्या तुलनेत चार आणेही रक्कम मिळत नाही. ना बाजारभाव, की नाही कर्जमाफी. कर्जाचा डोंगर माथ्यावर घेऊन सावकाराच्या बडग्यात अडकलेला बळीराजा कधी मोकळा श्वास घेईल, असा गंभीर प्रश्न बळीराजा पुढे निर्माण झाला आहे.
यावर्षी बटाटा पीक घेतले. अवकाळी पाऊस, त्यात वन्यप्राण्यांनी पिकांची होणारी नासाडी. यामुळे करावे तरी काय? वनविभाग पंचनामे करते तर घातलेले भांडवलही वसूल होत नाही. कर्जाचा डोंगर डोक्यावर घेऊन निसर्गाच्या अस्मानी संकटांना सामोरे जातो. सरकारने योग्य उपाययोजना करावी.
-राम फलके, शेतकरी आमोंडी
उसाचे तोंडाशी आलेले पिक भुईसपाट झाले. अवकाळी पावसाने संपूर्ण क्षेत्रातील उसाचे पिक सपाट झाले. शासन फक्त पंचनामे करते; मात्र खर्चाच्या मानाने हजार बाराशे रुपये खात्यावर जमा करते. समाधानासाठी फक्त सांत्वन केल्याचे भासवते. असेच चालले तर काही दिवसाने शेती आणि शेतकरी वर्गाला आत्महत्येशिवाय पर्याय उरणार नाही.
-राजेंद्र फलके, शेतकरी आमोंडी