पुणे – सध्या राज्यात 147 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. काही ठिकाणी मतदान प्रकिया पूर्ण होऊन निकालही हाती आलेत. कुठं महाविकास आघाडीनं बाजी मारलीय तर कुठं भाजप-शिंदे गटाचा विजय झाल्याचे दिसत आहे. आणखी काही बाजार समित्यांचा निकाल उद्या (30 एप्रिल) लागणार आहे.
दरम्यान, या बाजार समित्यांच्या निवडणुकांच्या रणधुमाळीत राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ठिकठिकाणी राजकीय नेते तळ ठोकून बसल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रयत भवन येथे सकाळी मतमोजणीला प्रारंभ झाला.
स्वतः विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यांनी निवडणुकीत बारकाईने लक्ष घालून व्युव्हरचना केली होती. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सर्वच उमेदवारांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांवर दणदणीत मात करीत विजय प्राप्त केला असल्याचं दिसून आलं आहे. बारामती उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत पॅनलने सर्वच्या सर्व 18 जागांवर दणदणीत विजय प्राप्त केला.
दरम्यान, याच विजयानंतर विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावेळी ते माध्यमांशी संवाद साधत होते. अजित पवार म्हणाले की.., “बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत रयत पॅनेलवर मतदारांनी जो विश्वास दाखविला, माझ्या आवाहनाला जो प्रतिसाद दिला, तो विश्वास माझे सर्व नवनिर्वाचित सहकारी सार्थ ठरवून दाखवतील.
दोन वगळता सर्वच नवीन चेहरे असल्याने ते जोमाने काम करतील. बाजार समितीचे कामकाज अधिक प्रभावी कसे होईल, याचाच आमचा प्रयत्न असेल, तसेच शेतकरी वर्गाने आम्हाला चांगला कौल दिला आहे, यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी चांगली मेहनत घेतली आहे.
त्यामुळे सर्वांचे अभिनंदन. बारामती मध्ये आम्ही साहेबांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम पद्धतीने काम करतोय याची पोहोचपावती आम्हाला मिळाली आहे. त्यामुळे आता आमची जबाबदारी वाढली असून ही जबाबदारी आम्ही चांगल्या पद्धतीने पार पाडू” असं अजित पवार यावेळी म्हणाले.